Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 15 August, 2009

स्वाईन फ्लूचा कहर सुरूच

बळीसंख्या २४
रायपुरात गेला पहिला बळी

पुणे/रायपूर, दि. १४ - स्वाईन फ्लूने महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रभावित झालेल्या पुणे येथील पंधराव्या आणि रायपूरमधील पहिल्या बळीने देशभरातील फ्लू बळींची संख्या आज २४ वर पोहोचली आहे.
आज पुण्यात ७० वर्षीय पारूबाई शिंदे यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. त्यांच्यात या आजाराची सर्व लक्षणे आढळून आली होती. त्यांच्या मृत्यूने आज पुण्यातील एकूण बळींची संख्या १५ वर पोहोचली आहे.
याशिवाय आज छत्तीसगडमध्येही फ्लूचा शिरकाव झाल्याचे सिद्ध झाले. येथील १८ वर्षीय सीताराम वर्मा याचे या फ्लूने निधन जाले. मूळचा तो भिलईचा राहणारा होता. न्यूमोनिया आणि घशातील इन्फेक्शनमुळे त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्या घशातील द्रवाची तपासणी करण्यात आली. त्याचे नमुने दिल्लीला पाठविण्यात आले. त्यातील अहवालात त्याला स्वाईन फ्लू झाल्याची पुष्टी करण्यात आली. तो नुकताच पुण्याहून परतला होता.
पुण्यासह देशात नाशिक, मुंबई, बंगलोर, अहमदाबाद, बडोदा, चेन्नई, रायपूर आणि तिरुवनन्तपुरम येथे स्वाईन फ्लूचे मृत्यू नोंदविण्यात आले आहेत. देशात स्वाईन फ्लूची बळीसंख्या दररोज वाढतच असल्याने केंद्र सरकारने तज्ज्ञांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची योजना आखली आहे. त्याची अंमलबजावणीही आजपासून सुरू झाली असून त्यात रुग्णांमध्ये या आजाराची लक्षणे कशी शोधायची, त्याचे निदान कसे करायचे, उपचार आणि दक्षता याविषयीची माहिती समाविष्ट राहणार आहे.
प्रयोगशाळेतील तपासणीचा मुख्य उद्देश
केंद्र सरकारने फ्लूसंदर्भातील प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश देशभरातील प्रयोगशाळांमध्ये शास्त्रीय पद्धतीने याची तपासणी व्हावी, हा असल्याचे समजते. देशातील खाजगी प्रयोगशाळांना स्वाईन फ्लूच्या तपासणीचे अधिकार देतानाच सरकारने तेथे किमान दोन तज्ज्ञ असावेत, असा आग्रह धरला आहे. रुग्णालयातून एखाद्या संशयिताचे रक्ताचे नमुने घेऊन जाताना कोेणती खबरदारी घ्यावी, मास्क कसा वापरावा यासह सर्वच बाबींची माहिती दिली जाणार आहे.

No comments: