Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 11 August, 2009

मध्यान्ह आहारातून ६ विद्यार्थ्यांना बाधा


वास्कोतील सलग दुसरी घटना
अन्न व औषध विभागाच्या अहवालाची प्रतीक्षा

वास्को, दि. १० (प्रतिनिधी)ः दोन दिवसापूर्वीच मध्यान्ह आहारातून मुरगाव तालुक्यातील १८ विद्यार्थ्यांना विषबाधा होण्याची घटना ताजी असताना आज गांधीनगर येथील सरकारी कन्नडा विद्यालयामधील ६ विद्यार्थ्यांना पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने येथील त्यांना चिखलीच्या कुटीर रुग्णालयात नेण्याची पाळी आली. या विद्यार्थ्यांना मध्यान्ह आहार घेतल्यावर त्रास झालेला असला तरी अन्नातून विषबाधा झालेली नसल्याचा प्राथमिक अंदाज येथील चिकित्सकांकडून व्यक्त करण्यात आला आहे. सदर खाद्यपदार्थ तपासणीसाठी अन्न व औषध विभागात पाठवण्यात आले असून अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
गोवा सरकारने सुरू केलेल्या मध्यान्ह आहाराच्या योजने अंतर्गत शनिवारी सडा येथील युवक संघ विद्यालयात पावभाजी खाल्ल्याने १८ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. या प्रकारामुळे मुरगाव तालुक्यातील पालक तसेच जनतेतून सरकारबाबत संतप्त प्रतिक्रिया येत असतानाच आज दुपारी गांधीनगर वास्को येथील सरकारी शाळेतील सहा विद्यार्थ्यांना मध्यान्ह आहाराच्या सेवनानंतरच पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने त्यांना त्वरित चिखली कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. परशुराम हडपल (वय १०, इयत्ता चौथी), धरेश बिजूर (वय १०, इयत्ता चौथी), सुनील मदार (वय ११, इयत्ता चौथी), पूनम हरिजन (इयत्ता चौथी), संगीता चव्हाण व अश्विनी हडपल यांना त्रास होऊ लागल्याने शाळेच्या कर्मचाऱ्यांनी प्रथम मुरगाव तालुका साहाय्यक भाग शिक्षण अधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. यानंतर त्या विद्यार्थ्यांना इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना चिखलीच्या कुटीर रुग्णालयात घेऊन आलेल्या हनुमंता नावी या शिक्षकाने "गोवादूत'शी बोलताना सांगितले की, आज सकाळी मध्यान्ह आहार दिल्यानंतर चाळीस विद्यार्थ्यांपैकी सहा जणांना पोटात त्रास होऊ लागला. यांपैकी दोघांना उलट्या झाल्याने त्यांना उपचारासाठी इस्पितळात आणल्याची माहिती त्यांनी दिली. गौरी गणेश नामक संस्थेकडून सदर शाळेला मध्यान्ह आहार पुरवण्यात येत असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली.
मध्यान्ह आहारामुळे विषबाधा झालेली नसल्याचा संशय इस्पितळाचे अधिकारी (मेडिकल ऑफिसर) सुहास गायतोंडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त करताना सदर विद्यार्थ्यांच्या आजारी पडण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याचे सांगितले.
दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच अन्न व औषध विभागाच्या अधिकारी श्रीमती आयवा फर्नांडिस, राजेंद्र नाईक व फ्लाविया डिसोझा यांनी या वेळी इस्पितळात आपली उपस्थिती लावून आजारी पडलेल्या विद्यार्थ्यांशी वार्तालाप करून माहिती मिळवून घेतली. त्याच प्रमाणे त्यांनी या वेळी येथील चिकित्सकांकडून माहिती घेताना मध्यान्ह आहारातून देण्यात आलेले खाद्यपदार्थ तपासणीसाठी आपल्या ताब्यात घेतले. याबाबत त्वरित अहवाल मिळेल, अशी माहिती अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. दरम्यान, उपचारानंतर सहाही विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले आहे आहे.

शनिवारी मध्यान्ह आहारातून विषबाधा होण्याची घटना घडल्यानंतर आज शिक्षण खात्याचे साहाय्यक संचालक एस. के. तळकर व मुरगावच्या साहाय्यक भाग शिक्षण अधिकारी अनुराधा सरदेसाई तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांनी येथील दहा वेगवेगळ्या शाळांना भेट देऊन त्यांना देण्यात येत असलेल्या मध्यान्ह आहाराची तपासणी केली. याबाबत सौ. सरदेसाई यांच्याशी संपर्क केला असता तपासणीच्या वेळी सर्व शाळेमध्ये येणारा आहार चांगला असल्याचे सांगून अशा प्रकारे वारंवार तपासणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. गांधीनगर येथील घटनेविषयी विचारले असता सदर घटनेबाबत शिक्षण खात्याचे उपसंचालक जी. पी. भट यांनी चिखलीच्या कुटीर रुग्णालयाच्या अधिकाऱ्याला संपर्क करून माहिती मिळवली असता त्यांना विषबाधा झाली नसून अन्य कारणामुळे ती आजारी पडल्याचे समजल्याचे त्यांनी सौ. सरदेसाई यांनी सांगितले. सदर खाद्यपदार्थाचे नमुने अन्न व औषध विभागात पाठवण्यात आले असून त्यांचा अहवाल मिळाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

No comments: