Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 31 January, 2009

चिंबल भागात टोळीयुद्ध दोघांचे अपहरण व बेदम मारहाण

पणजी, दि. ३० (प्रतिनिधी): चिंबल मेरशी येथे दोघा तरुणांचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्याची घटना घडली असून पुन्हा एकदा गुंडांच्या टोळ्यांनी आपले डोकेवर काढल्याची चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात बिच्चू टोळीचा म्होरक्या शौकत जाकिर ऊर्फ बिच्चू याला अटक करून भारतीय दंड संहितेच्या ३६४ व ३९४ कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. बिच्चू याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
बिच्चू याची काही दिवसांपूर्वीच खुनीहल्ला केल्याच्या प्रकरणी जामिनावर सुटका झाली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. इकबाल अब्दुल शेख व फैयाज शेख यांनी याविषयीची तक्रार पोलिसांत नोंदवली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इकबाल व फैयाज हे दोघे आपल्या दुचाकीवरून चिंबलहून पणजीला येत असताना बिच्चू व त्याच्या अन्य साथीदारांनी या दोघा तरुणांना अडवून त्यांना वाहनात कोंबले व मेरशी येथील एका अज्ञात स्थळी नेले. यावेळी त्यांना काठ्या तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. त्याचप्रमाणे त्यांना काल दिवसभर डांबून ठेवण्यात आले. आज सकाळी बिच्चू हा मेरशी येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्याला सापळा रचून अटक करण्यात आली.
या अपहरणात वापरण्यात आलेले वाहन क्रमांक जीए ०१ ए १७८६ पोलिसांनी जप्त केले आहे. तसेच या घटनेतील अन्य संशयितांचा शोध पोलिस घेत आहेत. याविषयीचा अधिक तपास पणजीचे निरीक्षक फ्रान्सिस्को कॉर्त करीत आहेत.

No comments: