Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 28 December, 2008

सुरक्षेचे अवडंबर नको पर्रीकर

अन्यथा राज्याच्या अर्थव्यवस्थेला फटका
पणजी, दि. २७ (प्रतिनिधी)- गोव्यावर दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेने मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडून सुरू असलेली असमंजस वक्तव्ये व सुरक्षेच्या निमित्ताने ठिकठिकाणी सुरू असलेली अनियंत्रित तपासणी यामुळे गोव्यातील नागरिक तथा पर्यटकांमध्ये विनाकारण भीती निर्माण झाली आहे. गोव्यातील पर्यटन उद्योगाचा महत्त्वाचा काळ असलेल्या नाताळ व नववर्षांच्या मौसमात सरकारकडून अविचारी पद्धतीने परिस्थिती हाताळली जात असल्याने त्याचे दूरगामी परिणाम राज्याच्या अर्थकारणांवर होणार असल्याचा धोका विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केला.
आज येथे पत्रकारपरिषदेत त्यांनी ही माहिती दिली.यावेळी भाजप विधिमंडळ गटाचे प्रवक्ते आमदार दामोदर नाईक हजर होते.गोव्यात दहशतवादी हल्ला होणार असल्याचे स्पष्ट संकेत किंवा स्पष्ट कोणतीही माहिती उपलब्ध नाही, केवळ मुंबई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशात सतर्कतेचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनाला आणून दिले.काही महिन्यांपूर्वी गोव्याला "सिमी' किंवा इंडियन मुजाहीद्दीन पासून धोका असल्याचे आपण सांगितले होते तेव्हा मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी त्यास नकार देण्यास अजिबात वेळ लावला नाही . त्याउलट आता मुंबईवरील हल्ल्यांनंतर खडबडून जागे झालेले सरकार मुंडी उडवलेल्या कोंबड्याप्रमाणे फडफडत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
मनुष्यहानी हेच दहशतवाद्यांचे लक्ष्य नाही. देशाचे किंवा राज्याचे आर्थिक कंबरडे मोडणे हादेखील त्यांचा प्रमुख उद्देश आहे. मुंबईत हॉटेल ताज व नरीमन हाऊसवर हल्ला झाल्यानंतर त्यांनी लगेच दुरुस्ती करून २१ डिसेंबर रोजी पुन्हा ही हॉटेल्स सुरू केली व दहशतवादी हल्ल्याचा अर्थकारणावर काहीही परिणाम होऊ शकला नाही असा संदेश पोहचवला.मात्र गोव्यात नेमकी परिस्थिती वेगळी आहे. येथे केवळ भीतीपोटी राज्याचे अर्थकारणच बिघडवले जात असून सर्व व्यवहार बंद करून दहशतवादी हल्ल्याला सामोरे जाण्याची ही पद्धत आपल्याला परवडणारी आहे काय, असा सवालही पर्रीकरांनी केला.
गृह खात्याने योजलेल्या सुरक्षा उपायांबाबत कोणतीही तक्रार नाही. तथापि, ही सुरक्षा लोक किंवा पर्यटकांसाठी जाचक ठरू नये याची दक्षता घेणे गरजेचे आहे. गोव्यावर "फियादीन' किंवा आत्मघाती हल्ला करण्याचे प्रयोजन असल्यास तो रोखणे खूपच कठीण आहे, त्यासाठी गुप्तचर यंत्रणा अधिक सक्षम व सतर्क असण्याची गरज आहे,असेही पर्रीकर म्हणाले. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी वक्तव्ये करताना थोडी काळजी घेण्याची आवश्यकता होती. त्यांच्या बेजबाबदार वक्तव्यांमुळे विदेशी व देशी पर्यटकांनी गोव्यात येण्याचे आपले मनसुबे रद्द केले,असेही त्यांनी सांगितले.राज्यात खुल्या किनारी पार्ट्यांवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला परंतु विविध बड्या हॉटेल्सना परवानगी दिली यात तफावत कशी काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पणजीतील मांडवी नदीत उभ्या असलेल्या कॅसिनो जहाजांना कोणती सुरक्षा पुरवण्यात आली आहे,असा सवाल करून सुरक्षेबाबत व्यावहारिक विचार करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. केंद्रीय गृहराज्यमंत्री श्रीप्रकाश जैस्वाल हे गोव्यात केवळ नाताळाची सुट्टी साजरा करण्यासाठी आले होते. या भेटीत त्यांनी गोव्यातील सुरक्षेचा घेतलेल्या आढाव्याला अर्थच नव्हता, अशी टीका पर्रीकर यांनी केली.

1 comment:

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys