Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 8 January, 2009

कसाब पाकिस्तानी असल्याचे पाकला मान्य

- डॉन व जियो वृत्त वाहिनीचे वृत्त
- विदेश मंत्रालयाचा नकार
- माहिती मंत्रालयाचा होकार

इस्लामाबाद, दि. ७ : मुंबईवर २६ नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या अतिरेकी हल्ल्यातील जिवंत पकडण्यात आलेला आत्मघाती हल्लेखोर अजमल आमीर कसाब हा पाकिस्तानी असल्याचे पाकने मान्य केल्याचे वृत्त पाकिस्तानमधील प्रसिद्ध "डॉन' व "जियो' या वृत्त वाहिन्यांनी दिले आहे. या दोन्ही वृत्त वाहिन्यांनी हे वृत्त देताना भलेही सरकारी हवाला दिला असला तरी पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने आपल्या नेहमीच्या प्रवृत्तीप्रमाणे हे वृत्त नाकारले असले तरी रात्री उशिरा आलेल्या वृत्तानुसार माहिती मंत्र्यांनी मात्र कसाब पाकिस्तानी नागरिक असल्याचे मान्य केले आहे.
पाकिस्तानमधील काही वृत्त वाहिन्यांनी स्टिंग ऑपरेशन करून कसाबची माहिती गोळा केली होती. कसाब हा फरिदकोटचा रहिवासी असून मुंबईवरील हल्ल्यासाठी जाण्याआधी तो फरिदकोटला येऊन आपल्या आईला भेटला होता, हे या स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून स्पष्ट झाले होते. आणि कसाबनेही आपल्या कबुली जबावात आईची भेट घेतल्याचे सांगितले होते. याशिवाय भारतानेही कसाब पाकिस्तानी असल्याचे पुरावे दिले होते. या सर्व पार्श्वभूमीवर डॉन व जियो वृत्तवाहिन्यांनी आज पाकच्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांचा हवाला देऊन कसाब पाकिस्तानी असल्याचे पाकने मान्य केले असल्याचे वृत्त दिले होते. प्राथमिक चौकशीनंतर कसाब पाकिस्तानी असल्याचे सिद्ध झाले असल्याचेही या वृत्तात म्हटले आहे. पाकिस्तानने हे मान्य केले असले तरी कसाबला कायदेशीर मदत दिली जाणार नाही, असेही पाकने स्पष्ट केले असल्याचे वृत्तवाहिन्यांनी सांगितले होते.
हे वृत्त पाकिस्तानप्रमाणेच आज भारतातील वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केल्यानंतर झरदारी व गिलानी यांच्या पाक सरकारने पुन्हा एकदा घुमजाव करून हे वृत्त नाकारले. आताच या संदर्भात बोलणे योग्य होणार नाही, असा खुलासा पाकच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता मोहम्मद सादिक यांनी केला आहे.
कसाब पाकिस्तानचा रहिवासी आहे की नाही, या संदर्भात चौकशी सुरू आहे. भारताने सादर केलेेल्या पुराव्यासंदर्भात तपासणी केली जात आहे. संभ्रमातून आजचे वृत्त प्रसारित झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.
आधी कबूल करायचे आणि नंतर घुमजाव करून आधी दिलेली कबुली अमान्य करायची, हे धोरणच जणूकाही पाक सरकार राबवीत असल्याचे जागतिक स्तरावर म्हटले जात आहे. या आधीप्रमाणेच आजही पाकने कसाबच्या नागरिकत्वावरून घुमजाव केले आहे. कसाब पाकिस्तानी नागरिक असल्याच्या पुराव्यासह भारताने दिलेेले चार सबळ पुरावे पाक सरकारने या आधीच नाकारले होते. हे पुरावे पुरेसे नसल्याचे पाकने म्हटले होते.
दुर्दैवी निर्णय : भारत
भारताने सादर केलेले पुरावे पुरेसे नसल्याचे जे विधान पाकने केले आहे, ते दुर्दैवी असल्याचे भारत सरकारचे म्हणणे आहे. पाकचा हा निर्णय म्हणजे कोणताही आधार न घेता देण्यात आलेली राजकीय अस्वीकृती आहे, असेही भारताने म्हटले आहे.
कोणतीही चौकशी व खात्री न करता पाकने अवघ्या २४ तासांमध्ये हे पुरावे नाकारले आहे. हे सारे काही अविश्वसनीय आहे, असेही भारताने म्हटले आहे.

No comments: