Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 7 January, 2009

म्हादई प्रकरणी भाजपचे सरकारला पूर्ण सहकार्य शिष्टमंडळ निमंत्रणात सरकारचे राजकारण : दामोदर नाईक

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी): म्हादईसारख्या जिव्हाळ्याच्या मुद्यावर गोवा प्रदेश भाजप राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करील, परंतु सरकारने याप्रकरणी भाजपला गृहीत धरण्याची चूक अजिबात करू नये,असा इशारा भाजप विधिमंडळ गटाचे प्रवक्ते तथा आमदार दामोदर नाईक यांनी दिला. म्हादईसंदर्भात दिल्ली येथे गेलेल्या शिष्टमंडळात भाजपतर्फे विधिमंडळ उपनेते फ्रान्सिस डिसोझा व आमदार मिलिंद नाईक यांनी भाग घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.
आज पणजीत झालेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते.आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर यावेळी हजर होते.म्हादईसंदर्भात गेली तीन वर्षे बेफिकीर राहिलेल्या कॉंग्रेस सरकारकडून विनाकारण भाजपचे असहकार्य मिळत असल्याचा आभास निर्माण केला जात असल्याचा आरोप श्री.नाईक यांनी केला. वेळोवेळी विधानसभेत हा विषय उपस्थित करून सरकारला जागे करण्याचे काम विरोधी पक्ष या नात्याने भाजपने केले आहे. यासंबंधी श्वेतपत्रिका तथा विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली असता त्यालाही सरकारकडून बगल देण्यात आल्याचे नाईक यांनी पत्रकारांच्या निदर्शनाला आणून दिले.
म्हादई हा पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याने त्याबाबत
कोणत्याही प्रकारचे राजकारण करण्यात भाजपला रस नाही. वाचाळपणामुळे नेहमीच चर्चेत असलेल्या खासदार शांताराम नाईक यांनी विनाकारण काहीही बरळून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये,असेही दामोदर नाईक यांनी स्पष्ट केले.
शिष्टमंडळ आमंत्रणातही राजकारण
दिल्लीला नेण्यात येणाऱ्या म्हादईसंदर्भातील शिष्टमंडळात भाजपला आमंत्रण देतानाही सरकारकडून घाणेरडे राजकारण झाल्याचा आरोप आमदार दामोदर नाईक यांनी केला.पहिल्यांदा ५ जानेवारी हा दिवस पंतप्रधानांच्या भेटीसाठी निश्चित करण्यात आली. पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या विधानसभा अधिवेशनासाठी प्रश्न देण्याची अंतिम मुदत ६ जानेवारी असल्याचे सांगण्यात आले आहे.एक जबाबदार विरोधी पक्ष या नात्याने विधानसभेत सरकारला विविध विषयांवरून कोंडीत पकडण्यासाठी हे प्रश्न तयार करून विधानसभेत देण्याची सर्व आमदारांची जबाबदारी असल्यामुळे विरोधी पक्षनेते व इतर आमदार व्यस्त होते. त्यामुळे दिल्लीला जाणे शक्य नव्हते. मुळातच भाजपला प्रश्न मांडता येऊ नये व अधिवेशन "शांततेत' पार पाडता यावे,या उद्देशानेच हा डाव रचण्यात आला होता,असा आरोप दामोदर नाईक यांनी केला.
म्हादई हा आंतरराज्य विषय असल्याने त्याबाबत दोन्ही सरकारांदरम्यान तोडगा निघणे महत्त्वाचे आहे. प्रदेश भाजपने कर्नाटकातील भाजप सरकारशी चर्चा करावी,असे बरळणाऱ्या सरकारने तो अधिकार भाजपला दिला आहे काय,असा सवालही उपस्थित करण्यात आला. सरकारला ही चर्चा करता येत नसेल तर खुर्चीवर बसण्याचा त्यांना अधिकार काय,असा टोलाही दामोदर नाईक यांनी हाणला.

1 comment:

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys