
"गोवादूत'च्या दिवाळीअंकाचे प्रकाशन करताना विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर (मध्यभागी) सोबत कार्मिक व्यवस्थापक विलास कामत, वृत्तसंपादक सुनील डोळे, जाहिरात व्यवस्थापक सुरेंद्र काकोडकर, अभिनव पब्लिकेशन प्रा. लि.च्या संचालक ज्योती धोंड, संपादक राजेंद्र देसाई, संचालक सागर अग्नी, कार्यकारी संपादक गंगाराम म्हांबरे.
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी)- विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते आज येथे "गोवादूत'च्या दिवाळी अंकाचे शानदार प्रकाशन "गोवादूत' मुख्यालयात पार पडले.
अल्पावधीत वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या या दैनिकाच्या आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल गौरवोद्गार काढून पुढील वाटचालीसाठी श्री. पर्रीकर यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संपादक राजेंद्र देसाई, अभिनव पब्लिकेशन प्रा. लि.च्या संचालक ज्योती धोंड, संचालक सागर अग्नी, कार्यकारी संपादक गंगाराम म्हांबरे, वृत्तसंपादक सुनील डोळे, जाहिरात व्यवस्थापक सुरेंद्र काकोडकर, कार्मिक व्यवस्थापक विलास कामत आणि कर्मचारी उपस्थित होते.
नारायण राणेंची "दहशत' संपली ः पर्रीकर
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीच्या प्रचारासाठी कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत गेलेल्या श्री. पर्रीकर यांनी, कोकणपट्टीत नारायण राणे यांची "दहशत' संपल्याचे निरीक्षण याप्रसंगी नोंदवले. ते म्हणाले, कोकणवासीयांशी संवाद साधल्यानंतर तेथील मतदार भयमुक्त होत असल्याचे आपणास प्रकर्षाने जाणवले. तसेच महागाईचा मुद्दा यावेळी निर्णायक ठरेल. सरकारी कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाचा फायदा झाला असला तरी महागाईचा तेवढ्याच वेगाने आगडोंब उसळल्याने संसाराची सारी गणिते पुन्हा पूर्वपदावर आली आहेत. शिवाय समाजातील असंघटित कामगारांना महागाईमुळे जगणेच महाकठीण बनले आहे. हा घटक सत्तारूढ कॉंग्रेसला अत्यंत अडचणीचा ठरणार आहे.
लोकांनी डोळसपणे आपले लोकप्रतिनिधी निवडण्याच्या गरजेवर श्री. पर्रीकर यांनी प्रामुख्याने भर दिला. लोकांसाठी तळमळीने राबणारा तो लोकप्रतिनिधी, असे सांगून ते म्हणाले, लोकप्रतिनिधी हा निष्क्रिय असू नये आणि दुसऱ्या बाजून तो जनतेच्या आकांक्षा धुळीला मिळवून केवळ स्वतःच्या तुंबड्या भरणाराही नसावा. आपल्या या मुद्यापुष्ट्यर्थ त्यांनी नेहमीच्या खुमासदार शैलीत उदाहरणे देऊन जागतिक मंदी, बदलता आर्थिक ढाचा या विषयांवरही विवेचन केले.
No comments:
Post a Comment