Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 9 October 2010

येडियुरप्पा सरकारवरचे संकट टळल्यात जमा

गोवा भाजपची यशस्वी शिष्टाई
कॉंग्रेस नेते रणांगणातून गायब

मडगाव, दि. ८ (प्रतिनिधी): गोव्यातील भाजप नेत्यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर कर्नाटकातील भाजप सरकारातील गेले चार दिवस सुरू असलेली बंडाळी शमल्यातच जमा आहे. उरलेले किरकोळ मतभेद संपुष्टात आणण्यासाठी रात्री उशिरापर्यंत संबंधितांशी चर्चा सुरू होती. दुसरीकडे डाव आपल्या हातातून निसटल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काल रात्री उशिरा हॉटेलातून निघून गेलेले गोव्यातील तिन्ही मंत्री व कॉंग्रेस नेते आज दिवसभरात पुन्हा हॉटेलकडे फिरकलेच नाहीत. आमदारांसाठी भलीमोठी प्रलोभने घेऊन आलेले निधर्मी जनता दलाचे नेते कुमारस्वामी यांनी आज सायंकाळी हॉटेल सोडले व त्यामुळे येडियुरप्पा सरकारवरील संकट टळल्याचे चिन्ह स्पष्ट झाले.
बाणावली येथील "ताज एक्झॉटिका' हे पंचतारांकित हॉटेल कर्नाटकांतील राजकीय हालचालींचे आज केंद्र बनून राहिले. काल सायंकाळी येथे दाखल झालेले भाजपचे ९ व ५ अपक्ष आमदार येथे मुक्काम ठोकून असल्याने साऱ्या देशाचे लक्ष येथे केंद्रित झालेले आहे. गोवा भाजप नेते मनोहर पर्रीकर व खासदार श्रीपाद नाईक कालपासून या आमदारांबरोबर बसून त्यांची मनधरणी करीत होते. आज त्यांच्या जोडीला आमदार तथा प्रदेश भाजप अध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर हेही आले. माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी सदर आमदारांसाठी प्रलोभने घेऊन आले असल्याची चर्चा होती पण स्थानिक भाजप नेत्यांच्या दक्षतेमुळे ते त्या आमदारांपर्यंत पोचूच शकले नाहीत.
कुमारस्वामी आज सकाळी आपण बंगलोरला जात असल्याचे सांगून हॉटेलातून बाहेर पडले; पण दुपारी परत आले व हॉटेलात राहिले. त्यामुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले होते. सायंकाळी ६ पर्यंत ते हॉटेलात होते. दरम्यानच्या काळात भाजपचे युवा नेते रुपेश महात्मे हे आतून बाहेर आले व त्यांनी आमदारांसोबत बैठका सुरू असून त्यांचे मतपरिवर्तन केले जात असल्याचे सांगितले आणि पत्रकारांना वस्तुस्थितीची कल्पना आली. त्यांनंतर ७ वा. च्या सुमारास कुमारस्वामी पुन्हा बाहेर आले व आपण बंगलोरला रवाना होत असल्याचे त्यांनी सांगितले. राजकीय घडामोडींबाबत विचारता विश्र्वास ठराव सोमवारी असल्याने तोपर्यंत "थांबा व प्रतीक्षा करा,' असे ते म्हणाले. कॉंग्रेस व निजद ठरावाविरुद्ध मतदान करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हॉटेलात कर्नाटकचे पर्यटनमंत्री जनार्दन रेड्डी, कृषीमंत्री श्री. कत्ती व राज्यसभेचे खासदार प्रभाकर कोरे असून तेही राजकीय संकट टाळण्याच्या प्रयत्नांत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. स्थानिक भाजपा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील विवाद यापूर्वीच शमलेला आहे व आता उरले आहेत ते कौटुंबिक वाद व रुसवे - फुगवे. ते सोडविण्यासाठी प्रत्येकाशी वेगवेगळी चर्चा सुरू आहे. ती गरज पडल्यास उद्याही सुरू राहील. दरम्यान पर्रीकर व अन्य नेत्यांनी चौदाही आमदारांशी एकत्रितपणे चर्चा करण्याबरोबरच प्रत्येकाशी किमान चर्चेच्या पाच फेऱ्या पूर्ण केल्याचे पक्षाचे राज्य प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी "गोवादूत'शी बोलताना सांगितले.
कुमारस्वामी बरोबर हॉटेलांतून बाहेर आलेले गोव्याचे माजी मंत्री संजय बांदेकर यांनी आपण आपले जावई आनंद अस्नेाटीकर यांना भेटण्यासाठी हॉटेलात आल्याचे व त्यात कोणतेच राजकीय कारण नसल्याचे सांगितले. आज कर्नाटकातील अनेक भाजप नेते बाणावलीत दाखल झाले. त्यांतील मोजक्यांनाच आत सोडण्यात आले. बहुतेकांनी राज्यातील भाजप सरकारला कोणताच धोका पोचणार नाही, अशी आशा व्यक्त केली. त्यात कोलारमधील राज्यसभा खासदार डी. एस. वीरय्या यांचाही समावेश होता.
आज सकाळी साधारण साडेदहा वाजता पर्रीकर यांनी हॉटेलबाहेर मुख्य फाटकापाशी येऊन पत्रकारांशी संवाद साधला व सांगितले की कर्नाटकांतील राजकीय पेंचप्रसंग संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. निजद नेते तथा माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी राजकीय सौदेबाजी करण्याचा भरपूर प्रयत्न केला पण तो यशस्वी होऊ शकला नाही. आपण व खासदार श्रीपाद नाईक हे येथे मुक्काम ठोकून गैरसमज झालेल्या भाजप व अपक्ष आमदारांची समजूत घालत असून त्यात ५५ ते ६० टक्के यश आलेले आहे. आपण भाजपच्या राष्ट्रीय सुशासन समितीचा अध्यक्ष या नात्याने राष्ट्रीय नेत्यांच्या सूचनेवरून लक्ष घातल्याचे त्यांनी सांगितले. हे प्रकरण संपुष्टात येईपर्यंत या लोकांबरोबर आपण असेन असेही त्यांनी स्पष्ट केले.
कॉंग्रेसची झाली कुचंबणा
काल रात्री पर्रीकर यांनी हॉटेलमधून बाहेर पडून मडगावात जाऊन जेवण घेतले. नंतर ते हॉटेलात परतले. त्यांच्या व श्रीपाद नाईक यांच्या असंतुष्टांबरोबर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. त्या आजही पुढे चालू राहिल्या. त्यापूर्वी काल सायंकाळी हॉटेलात डेरेदाखल झालेले गृहमंत्री रवी नाईक, त्यापूर्वी वीजमंत्री आलेक्स सिकेरा हे एकेक करून हॉटेलातून बाहेर पडले ते परत न फिरकण्यासाठीच. त्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव हे एका विवाह समारंभाचे निमित्त करून बाहेर पडले.पाठेापाठ प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस विजय सरदेसाई हेही गेले होते. तेदेखील परत फिरकले नाहीत. त्यामुळे कर्नाटकातील या राजकीय खेळीतून कॉंग्रेसने अंग काढून घेतल्याचे स्पष्ट झाले.
कॉंग्रेसकडून गंभीर दखल
गोव्यात मुक्काम ठोकलेल्या कर्नाटकातील आमदारांबरोबर गोव्यातील मंत्री असल्याच्या वृत्ताची गंभीर दखल कॉंग्रेस हायकमांडने घेतली. हरिप्रसाद यांनी त्याबाबत गृहमंत्री रवी नाईक व इतरांना जाब विचारल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. कर्नाटकातील या संघर्षात कॉंग्रेसची कोणतीही भूमिका नाही, असे हरिप्रसाद यांनी स्पष्ट केल्याने रवी व अन्य मंत्र्यांनी बाणावलीतून काढता पाय घेतला. या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्यातील एका मंत्र्याशी जवळीक असलेल्या एका नेत्याने हे आमदार गोव्यात येत असून त्यांच्या निवासाची व्यवस्था करा, असे कळविले होते. या मंत्र्याने आपल्या पक्षनिष्ठेची खात्री पटवण्यासाठी त्यांना विमानतळावरून बाहेर काढून हॉटेलापर्यंत नेले. खरे तर हे काम त्याने खास मित्र असलेल्या भाजपच्या एका नेत्याच्या विनंतीवरून केले होते. कॉंग्रेस पक्षाचा किंवा अन्य कोणाचाही त्याच्याशी संबंध नव्हता मात्र. कॉंग्रेसच्या एक मंत्री भाजपच्या आमदारांना हॉटेलमध्ये घेऊन जातो म्हणजेच हायकमांडच्या आदेशावरूनच ते असेल असे समजून कॉंग्रेसचे अन्य मंत्रीही तेथे धावत गेले व तेथील बंदोबस्ताची व्यवस्था केली. परंतु विरोधी पक्षनेते तसेच कर्नाटकांतील भाजपा खासदाराने या प्रकरणात गोवा सरकारच्या भूमिकेचा राष्ट्रीय प्रसारमाध्यमांतून भांडाफोड केल्याने कॉंग्रेसला बचावात्मक पवित्र्यात घ्यावा लागला. स्थानिक नेत्यांना त्यासंदर्भात जाब विचारला गेल्यामुळे एकेक करून मंत्र्यांनी तेथून काढता पाय घेतला. तेथेच कॉंग्रेसच्या हातातून डाव निसटला.
भाजप कार्यकर्ते आक्रमक
कर्नाटकातील येडीयुरप्पा सरकार अस्थिर करण्यामागे कॉंग्रेसचाच हात असल्याचा आरोप करून स्थानिक भाजप कार्यकर्ते काल सायंकाळपासून या हॉटेलच्या मुख्य प्रवेशव्दारालगत ठाण मांडून बसले आहेत. कोणीही भाजप नेता कर्नाटकातील आमदारांची भेट घेण्यासाठी आला असता ते भाजपचा जयजयकार करून वातावरण दणाणून सोडतात. त्याचबरोबर कॉंग्रेसची निर्भत्सना करताना दिसतात. आज गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर हॉटेलात जाण्यासाठी आले असता त्यांनी अशाच प्रकारे घोषणा देऊन वातावरण दणाणून सोडले. नंतर त्यांना गाडीतून आत सोडण्यास पोलिसांना भाग पडले. मिळालेल्या माहितीनुसार गोवा भाजपाच्या या आक्रमक पवित्र्यामुळेच ताज एक्झॉटिका हे दक्षिण गोव्यातील हॉटेल कर्नाटकातील आमदारांवर प्रभाव पाडण्यासाठी निवडण्याचा कॉंग्रेसचा डाव फसला. स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेचे आज सर्वत्र कौतुकच होताना दिसून आले. रुपेश महात्मे, नवीन रायकर, मडगाव भाजप गटाध्यक्ष चंदन नायक, देवबाला भिसे व त्यांच्या सहकारी आज बाणावलीत तळ ठोकून होत्या.
पोलिस छावणीचे स्वरूप
बाणावलीतील या पंचतारांकित हॉटेलला काल सायंकाळपासून पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. पोलिस उपअधीक्षक उमेश गावकर व निरीक्षक संतोष देसाई यांच्या नेतृत्वाखाली किमान डझनभर पोलिस उपनिरिक्षक व सहाय्यक उपनिरिक्षक येथे तळ ठोकून आहेत. शिवाय संपूर्ण हॉटेललाच पोलिसांनी गराडा घातलेला आहे. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांत महिला कर्मचारीही आहेत. मात्र नेमका हा बंदोबस्त कशासाठी व कोणाच्या सांगण्यावरून ठेवण्यात आला हे पोलिस अधिकारी सांगू शकले नाहीत. गुरुवारी दुपारनंतर या आमदारांना येथे आणण्यात आल्यापासून तेथे पोलिस बंदोबस्त असून त्यानंतर त्यांची पाळी आज सकाळी बदलली गेली; तर सकाळी ड्युटीवर आलेल्यांना सायंकाळी जाऊ देण्यात आले. या बंदोबस्ताला आता पोलिसही कंटाळल्याचे दिसले. कोणतीही कामगिरी नसताना त्यांना उन्हात उभे राहावे लागत आहे. हॉटेलच्या मुख्य फाटकाबाहेर तर दोन्ही बाजूंना या खाकीधारींचीच गर्दी दिसते. या आमदारांना काणकोणमधील इंटर कॉन्टिनेंटल या सप्ततारांकित हॉटेलात ठेवण्याचा बेत होता; पण स्थानिक कॉंग्रेस नेत्यांनी काणकोणच्या फेऱ्या टाळण्याच्या प्रयत्नांत त्यांना ताज एक्झॉटिकामध्ये ठेवले. त्यामुळे सदर हॉटेल या राजकीय घडामोडींचे प्रमुख केंद्र केंद्र बनले आहे.
वृत्त वाहिन्यांनी टाकला तळ
ताज एक्झॉटिका हॉटेलबाहेर काल रात्रीपासूनच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी डेरा टाकला आहे. आज (शुक्रवारी) सकाळी तर कर्नाटकांतील कन्नड वाहिन्यांची पथके आपल्या साधनसामुग्रीसह येऊन दाखल झाल्याने हॉटेलबाहेर जत्रेचे स्वरूप आले. एनडीटीव्हीबरोबरच गोव्यातील वृत्तवाहिन्यांची मंडळी व अन्य प्रसारमाध्यमांनी हॉटेलच्या फाटकाबाहेर तळ ठाकला आहे. एका बाजूने पोलिस व दुसऱ्या बाजूने ही मंडळी यांमुळे हॉटेलमध्ये जाणारे पर्यटकही बिचकताना दिसत आहेत.
हॉटेल कर्मचाऱ्यांची व्यथा
कर्नाटकातील या राजकीय घडामोडींमुळे ताज एक्झॉटिका जरी सध्या राष्ट्रीय प्रसिद्धी माध्यमांचे केंद्र बनलेले असले तरी या घडामोडींमुळे तेथे पोलिसांनी उभारलेले कडे व सुरक्षाव्यवस्थेमुळे हॉटेलमधील पर्यटक स्थलांतर करू लागल्याचे सांगण्यात येते. अशावेळी तेथील कर्मचाऱ्यांची मिळकतही बंद झालेली आहे. कधी एकदा हे नाट्य संपते अशी त्यांची अवस्था झाली आहे.

'पोर्तुगिजांच्या भाटांना धडा शिकवणार'

अशोकस्तंभाच्या उपेक्षेमुळे राष्ट्रप्रेमी संघटना खवळल्या
पणजी, दि. ८ (प्रतिनिधी): पणजी महापालिका उद्यानातील अशोकस्तंभाची झालेली दारुण उपेक्षा आणि या उद्यानाचे केलेले पोर्तुगीज नामकरण या मुद्यांवरून राष्ट्रप्रेमी संघटना खवळल्या असून त्यांनी जोरदार आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. विविध घटकांतून यासंदर्भात अत्यंत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
"गार्सिया द ऑर्त' हा पोर्तुगाली वनस्पती शास्त्रज्ञ. त्याचे नाव या उद्यानाला पणजी महापालिकेने दिले आहे. शिवाय हे करताना तेथे असलेल्या भव्य अशोकस्तंभाचे साधे सुशोभीकरणही करण्यात आलेले नाही. त्यामुळे तो कमालीच्या संतापाचा विषय ठरला आहे. विशेषतः गोवा मुक्तिसंग्रामात असीम त्याग केलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे रक्त या घटनेमुळे सळसळले आहे.
हा गार्सिया द ऑर्त जर कुणाचा "पूर्वज' लागत असेल तर त्यांनी त्याचे नाव आपल्या स्वतःच्या घराला किंवा दिवाणखान्याला देण्यात कुणाची हरकत नसावी. मात्र गोव्यातील राजधानीसारख्या प्रमुख शहरातील एका भागाला साम्राज्यवादी पोर्तुगिजांची हुजरेगिरी करणाऱ्या एका तद्दन पोर्तुगीजाचे नाव देण्याचे कारस्थान ही सामान्य घटना नाही. हा जाणूनबुजून केलेला भारतीय स्वातंत्र्याचा आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचा धडधडीत अपमान आहे. तो कदापिही सहन केला जाणार नाही. त्याविरोधात आंदोलनाचे रणशिंग फुंकले जाईल, असा जळजळीत इशारा आज देशप्रेमी नागरिक समितीचे गोवा राज्य निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी दिला.
"गोवादूत'ने काही दिवसांपूर्वी पणजी महापालिकेच्या उद्यानाला पोर्तुगीज व्यक्तीचे नाव दिल्याची आणि या उद्यानात असलेल्या अशोकस्तंभाची हेळसांड करण्यात आलेल्या घटनेची माहिती उघडकीस आणली होती. यानंतर विविध स्तरांतून गार्सिया द ऑर्त' हा पोर्तुगीज व्यक्तीच्या नावाला विरोध व्हायला लागला असून गोमंतकीयांनी आणि स्वातंत्र्यसैनिकांनी या नावाला तीव्र विरोध दर्शवला आहे. तसेच त्यांनी महापालिकेच्या या हिणकस कृतीचा निषेध केला आहे.
पोर्तुगीज साम्राज्यवादाच्या भाटांना त्यांची जागा दाखविण्यासाठी आंदोलन करणे क्रमप्राप्त असल्याचे श्री. वेलिंगकर यांनी सांगितले.
एका बाजूने गार्सिया द ऑर्त चा उदोउदो करतानाच दुसरीकडे अशोकस्तंभाचा सुशोभन कार्यात समावेश करण्यासही ही पोर्तुगिजांची पिलावळ सोयीस्करपणे विसरलेली आहे. या सर्व विकृत मनोवृत्तीचा गोमंतकीय जनता तीव्र धिक्कार करीत आहे. या विकृतीला कृतीने उत्तर देण्याचे काम गोमंतकीय पुढच्या आठवड्यात करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भारताचा 'गरबा' सुरूच; दिवसभरात ६ सुवर्ण

यजमानांच्या खात्यात तब्बल ४५ पदके जमा
नवी दिल्ली, दि. ८ : एकोणीसाव्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत यजमान भारताने सुवर्णपदकांची "लूट' सुरूच ठेवताना आज पुन्हा तब्बल अर्धा डझन सोन्याच्या पदकांवर आपला हक्क सांगितला. त्यामुळे यजमानांच्या खात्यात आता २० सुवर्ण , १४ रौप्य आणि १२ ब्रॉंझ अशी एकूण ४५ पदकेजमा झाली आहेत.
आजच्या दिवसाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे नाशिकच्या कविता राऊतने १० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत पटकावलेले ब्रॉन्झ पदक. तिने अभिमानास्पद कामगिरी बजावली. या स्पर्धेत केनियाच्या स्पर्धकांनी पहिले आणि दुसरे स्थान संपादले.
१० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये ओमकार सिंगने तिसरे सुवर्ण पदक मिळवले. त्यामुळे भारताच्या खात्यात २० वे सुवर्णपदक जमा झाले आहे. ओमकारने १० मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्ण कामगिरी केली आहे. यापूर्वी ओमकार सिंगने गगन नारंग आणि गुरप्रीतसिंग सोबत दोन सुवर्ण पदक पटकावली आहेत. ओमकारने तीन सुवर्णपदक मिळवत आता गगन नारंगशी बरोबरी केली आहे. राष्ट्रकुलमध्ये भारताचा नवरात्र उत्सव दणक्यात साजरा होतोय. भारताच्या दोन रणरागिनींनी कुस्तीमध्ये सुवर्ण पटकावून दसऱ्यापूर्वीच सोने लुटले आहे. अलका तोमरने ५९ किलो वजनी गटात आणि अनिताने ६७ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. महिला कुस्तीगिरांच्या कामगिरीमुळे महिला कुस्तीत भारताला आतापर्यंत ३ सुवर्णपदके मिळाली; तर एकूणच कुस्ती प्रकारात भारताला ७ सुवर्णपदके मिळाली आहेत. त्यात पुरुषांना ग्रीक रोमन प्रकारात चार सुवर्णपदक जिंकली आहेत. दरम्यान जिमनॅस्टिकमध्ये अखिलकुमारने वॉल्ट प्रकारात रौप्यपदक पटकावले. २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल ( वैयक्तिक) पुरुष वर्गात विजयकुमारने सुवर्णपदक पटकावले तर गुरुप्रीतसिंहने ब्रॉंझ जिंकले. आज ( शुक्रवारी) सकाळी तिरंदाजीत महिला संघाने व त्यापाठोपाठ ५० मीटर थ्री पोझिशन्स रायफल प्रकारात गगन नारंग आणि इम्रान हसन खानने सुवर्णपदक जिंकले.

तीन खून प्रकरणांतून दोषमुक्त झाल्यावर

महानंदला बलात्कारप्रकरणी
७ वर्षे कारावास आणि दंड

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी)>: सीरियल किलर महानंद नाईक याला बलात्कार प्रकरणात आज जिल्हा व सत्र न्यायालयाने ७ वर्षे कारावास आणि २५ हजार रु. दंड अशी शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास त्याला आणखी दोन महिने अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल. जर दंडाची रक्कम त्याने भरली तर ती सदर पीडित तरुणीला दिली जावी, असा आदेश आज न्यायाधीश नूतन सरदेसाई यांनी दिला. महानंदला भारतीय दंड संहितेच्या ३७५ व ३७६ कलमांखाली दोषी धरण्यात आले.
दुपट्ट्याच्या साहाय्याने १६ तरुणींचा खून केल्याचा आरोप असलेल्या महानंद नाईक याला पहिल्यांदाच शिक्षा झाली आहे. यापूर्वी तीन खून प्रकरणात सबळ पुराव्याअभावी तो दोषमुक्त झाला आहे.
पत्नीच्या मैत्रिणीवर सतत पाच वर्षे बलात्कार केल्याप्रकरणी महानंद याला ५ ऑक्टोबर रोजी दोषी ठरवण्यात आले होते. आज सकाळी न्यायालयात हे प्रकरण सुनावणीस आले असता त्याला शिक्षा ठोठावण्यात आली. महानंद हा समाजासाठी घातक असून त्याला त्या दृष्टिकोनातून शिक्षा दिली जावी, अशी जोरदार मागणी सरकारी वकिलांनी केली होती.
योगिता नाईक बेपत्ता प्रकरणातून हे बलात्कार प्रकरण उघडकीस आले होते. ज्या तरुणींवर महानंद सतत पाच वर्षे बलात्कार करीत होता तिने त्याच्या या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या तरुणीच्या नावावर असलेले मोबाईल सिमकार्ड महानंद वापरत होता. फोंडा येथून बेपत्ता झालेली योगिता नाईक हिच्या मोबाईलवर या क्रमांकावरून अनेक दूरध्वनी आल्याचे उघड झाल्यानंतर त्या तरुणीला चौकशीसाठी पोलिस स्थानकावर बोलावण्यात आले होते.
यावेळी त्या तरुणीची चौकशी सुरू असताना हा मोबाईल क्रमांक महानंद वापरत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्यावेळी पोलिसांनी महानंदला पोलिस स्थानकावर बोलावले असता, गेल्या पाच वर्षांपासून महानंद धमकावून आपल्यावर शारीरिक अत्याचार करीत असल्याची माहिती संबंधित तरुणीने पोलिसांना दिली. त्यामुळे पहिल्यांदा पोलिसांनी त्याला बलात्कार प्रकरणात अटक केली. यानंतर सोळा जणांचे गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आल्या होत्या.

चीनच्या कारागृहात असणारे ली झियाबो यांना शांततेचा नोबेल

चिनी सरकार मात्र अशांत
ओस्लो, दि. ८ : चीनच्या कारागृहात बंदिस्त असणारे मानवाधिकार क्षेत्रातील लढवय्ये नेते ली झियाबो यांना २०१० या वर्षासाठीचा सर्वोच्च मानाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. चीनमध्ये मानवाधिकाराच्या रक्षणासाठी त्यांनी दीर्घकाळपासून अहिंसेच्या मार्गाने आपला लढा कायम ठेवला आहे. या निर्णयाने चिनी सरकार मात्र नाराज होण्याची चिन्हे दिसत आहेत.
नोबेल पुरस्कार समितीचे अध्यक्ष जॅगलण्ड यांनी या पुरस्काराची घोषणा केली. ते म्हणाले की, चीन हे आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या महासत्ता म्हणून जगासमोर आले आहे. पण, अशा महासत्तेला नेहमीच काही बाबतीत टीकेचा सामना करावा लागतो. तसा चीनला मानवाधिकाराबाबत जागतिक समुदायाचा टीकेचा मारा सहन करावा लागला आहे. तेथील मानवाधिकारासाठी ली झियाबो यांनी अहिंसेचा मार्गाने दिलेला लढा अतिशय उल्लेखनीय आहे.
५४ वर्षीय ली यांनी नेहमीच चीनमध्ये लोकशाही व्यवस्थेचा पुरस्कार केला आहे. शांततेच्या मार्गाने राजकीय आणि सामाजिक बदल व्हावेत, असेच त्यांचे मत राहिले आहे. त्यासाठी त्यांनी एक स्वाक्षरी मोहीमही राबविली होती. चीनमध्ये नागरिकांना अधिकाधिक स्वातंत्र्य मिळावे आणि कम्युनिस्ट पक्षाचे राजकीय वर्चस्व संपुष्टात यावे, यासाठी त्यांनी "चार्टर ०८' या दस्तावेजाचे लिखाण केले. चीनमध्ये आता लोकशाहीचा अस्वीकार फार काळपर्यंत लांबविता येणार नाही, असा या दस्तावेजातील मजकूर होता. हजारो चिनी नागरिकांनी यावर स्वाक्षरीही केली होती. चीनमधील प्रस्थापितांच्या दृष्टीने मात्र हे थेट आव्हान होते. त्यामुळे त्यांनी "चार्टर ०८' हे ८ डिसेंबर २००८ रोजी जारी होण्यापूर्वीच ली यांना अटक केली. तेव्हापासून ते कारागृहातच आहेत.
चीन सरकारचा विरोध
शांततेचे नोबेल हा जगातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. या पुरस्काराच्या शर्यतीत ली यांचे नाव येताच चीन सरकारने त्यांना हा पुरस्कार देऊ नये, असे म्हटले होते. पण, आता चीनची पर्वा न करता नोबेल समितीने ली झियाबो यांची निवड केली आहे. त्यामुळे सहाजिकच चीन सरकारची नाराजी ओढवली आहे.

धारबांदोडा अपघातात दुचाकीस्वार मृत्युमुखी

फोंडा, दि.८ (प्रतिनिधी): प्रतापनगर धारबांदोडा येथे आज सकाळी पावणे सहाच्या सुमारास मोटर सायकलला (जीए ०९ एफ ३१२५) झालेल्या अपघातात दुचाकीस्वार प्रसाद प्रकाश पावसकर (१९ वर्षे, रा.दयानंदनगर) मरण पावला.
सकाळी प्रसाद पावसकर दुचाकीवरून दयानंद धारबांदोडा येथून तिस्क उसगाव येथे व्यायामशाळेत जात असताना वाटेत प्रतापनगर येथे खराब रस्त्यामुळे त्याच्या दुचाकीला अपघात झाला. वाहनावरून घसरून पडल्यामुळे त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ १०८ रुग्णवाहिकेतून बांबोळी येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात असता तेथे उपचार सुरू असताना तो सकाळी ११.३० च्या सुमारास मरण पावला. प्रसाद पावसकर कुटुंबीयांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अपघाती निधनामुळे पावसकर कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक पेडणेकर, हवालदार किशोर नाईक यांनी पंचनामा केला.

Friday, 8 October 2010

आरक्षणाचे निकष कोणते?

सविस्तर माहिती द्या; खंडपीठाकडून सरकारला आदेश
पणजी, दि. ७ (प्रतिनिधी): पालिका निवडणुकांसाठी जाहीर केलेल्या आरक्षणाला विरोध करणारी याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सुनावणीस आली असता निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिले. यावेळी याचिकादाराने आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्यासाठी केलेली विनंती न्यायालयाने मान्य न करता सदर आरक्षण कोणत्या आधारावर केले आहे, याची सविस्तर माहिती देण्याचे आदेश दिले. याविषयीची पुढील सुनावणी येत्या सोमवारी ठेवण्यात आली आहे.
पालिका प्रशासन संचालकांनी मडगाव नगरपालिकेसाठी जाहीर केलेल्या आरक्षणाला लॉरेल आब्रांचिस व अन्य दोघांनी खंडपीठात आव्हान दिले आहे. मडगाव पालिकेसंदर्भात अधिसूचित केलेली निवडणूक व निवडणूक कार्यक्रम बेकायदा, अन्यायकारक असल्याचा दावा करून हा अध्यादेश रद्दबातल करावा अशी जोरदार मागणी आज याचिकादारातर्फे खंडपीठात करण्यात आली. कोणत्याही प्रकारचे निकष निश्र्चित न करता वाटेल तसे आरक्षण केल्याने नगरपालिका कायदा कलम १० चे उल्लंघन झाल्याचा दावाही यावेळी करण्यात आला. तसेच वर्गीकृत जाती व जमातीतील महिलांसाठी प्रभाग निश्र्चिती करताना तेथील लोकांची संख्या विचारात घेण्यात आली नाही याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले.
त्यामुळे कोणत्या निकषावर हे आरक्षण ठरवण्यात आले आहे, असा प्रश्न न्यायालयाने केला. तसेच, या आरक्षणाचा आराखडा कधी तयार केला आणि लोकांसाठी तो कधी उपलब्ध करून ठेवला होता, याचीही माहिती दिली जावी, असेही न्यायालयाने निवडणूक आयोगाला सांगितले आहे. निवडणूक कार्यक्रम अधिसूचित करण्यास व नियम ४ अन्वये आदेश जारी करण्यास हेतुपुरस्सर विलंब लावला गेला व त्यासाठी काही राजकारण्यांनी फूस दिली. स्वतःच्या पसंतीचे उमेदवार पालिकेवर निवडून आणून त्यावर नियंत्रण मिळविणे हा हेतू त्यामागे आहे, असा युक्तिवाद याचिकादाराने केला.
प्रभाकर पेंढारकर यांचे निधन
पुणे, दि. ७ : ज्येष्ठ दिग्दर्शक प्रभाकर पेंढारकर यांचे आज पुण्यात निधन झाले. प्रभाकर पेंढारकरांची "रारंगढांग' ही कादंबरी गाजली होती. ते भालजी पेंढारकरांचे सुपुत्र असलेल्या प्रभाकररावांनी अनेक दर्जदार चित्रपटांची निर्मिती केली.
प्रभाकर पेंढारकर यांनी १९५२ ते १९५९ पर्यंत भालजी आणि व्ही. शांतराम यांच्या हाताखाली सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. १९६१ पासून त्यांनी फिल्म डिव्हिजन सोबत काम केले. त्यांना सर्वोत्तम शैक्षणिक चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी १९६१ मध्ये "भाव तिथं देव', १९८१ मध्ये "बाल शिवाजी', १९८६मध्ये "शाब्बास सुनबाई' हे चित्रपट काढले होते. त्यांच्या निधनाने मराठी चित्रसृष्टीतील अनेक मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त केले.

मारिओ लोसा यांना साहित्याचे 'नोबेल'
स्टॉकहोम, दि. ७ : स्पॅनिश भाषेतील आघाडीचे कादंबरीकार मारिओ वर्गास लोसा यांना २०१० सालचे साहित्याचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. लोसा हे ख-या अर्थाने वैश्विक नागरिक असून ते सामाजिक परिवर्तनाचे शिलेदार असल्याचा उल्लेख स्वीडीश अकादमीने केला आहे.
जुलुमी राजवटीच्या विरोधात व्यक्तीच्या प्रतिकाराचे , बंडखोरीचे आणि पराजयाचे प्रत्ययकारी चित्रण आपल्या साहित्यातून रेखाटल्याने त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येत असल्याचे स्वीडीश अकॅडमीने म्हटले आहे.
पेरुच्या वर्गास ललोसा यांनी आजवर ३० कादंबऱ्या , नाटके असे लेखन केले आहे. त्यात प्रामुख्याने कॉन्व्हरसेशन इन द कॅथडरल आणि द ग्रीन हाऊस या कादंबऱ्यांचा समावेश आहे.
लोसा यांना १९९५ साली सरवॅटेस पुरस्काराने गौरवण्यात आले होते. स्पॅनिश जगतातील साहित्य क्षेत्रातला हा सर्वोच्च बहुमान मानला जातो. लोसा यांनी १९६० साली लिहिलेल्या द टाइम ऑफ हिरो या कादंबरीने त्यांना जगमान्यता मिळवून दिली.

भारताच्या खात्यात आणखी तीन सुवर्ण
नवी दिल्ली, दि. ७ : राष्ट्रकुल स्पर्धेत आज (गुरुवार) चौथ्या दिवशीही सुवर्णपदकांची लूट कायम ठेवली. कुस्तीमध्ये महिलांच्या ५५ किलो वजनी गटात फ्री स्टाईल प्रकारात गीताने, तर नेमबाजीत दहा मीटर पेअर पिस्तुल प्रकारात ओंकार सिंह आणि गुरप्रीत सिंग आणि २५ मीटर पिस्तुल पेअर प्रकारात गुरप्रीत सिंग आणि विजय कुमारने अशी तीन सुवर्णपदकांची कमाई भारताने आज केली.
महिला कुस्तीत गीताने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. राष्ट्रकुलमध्ये भारताने आतापर्यंत १४ सुवर्णपदके, ११ रौप्य व ८ कास्यपदके जिंकून पदकतालिकेत दुसरा क्रमांक मिळवला आहे. महिला कुस्तीत ६३ किलो वजनी गटात सुमन कुंदा हिने ब्रॉंझ पदक जिंकले. तर, नेमबाजीत रंजन सोधी यानेडबल ट्रॅपमध्ये रौप्य पदक पटकाविले. सकाळी तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या महिला गटाने मलेशियाला मागे टाकत ब्रॉंझ पदक जिंकले.

'हुजी'च्या दोघा दहशतवाद्यांनी गोव्यात तळ ठोकल्याचे उघड

मुंबईच्या दिशेने दोघांचेही पलायन
कॉईनबॉक्सवरून आला होता दूरध्वनी

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी): हरकत-ऊल-जिहाद-अल-इस्लाम (हुजी) या दहशतवादी संघटनेचे दोघे दहशतवादी गोव्यातून मुंबईला गेल्याची माहिती गोवा पोलिसांनी मुंबई पोलिसांना दिली असून गोव्याबरोबर मुंबईतही खळबळ माजली आहे. एका "कॉईन बॉक्स'वरून, "हुजी' दहशतवादी संघटनेचे दहशतवादी गोव्याहून मुंबईला गेल्याची माहिती देणारा दूरध्वनी गोवा पोलिसांना आला होता. हा "कॉईन बॉक्स' पर्वरी बाजारात असल्याची माहिती आज गोवा पोलिस खात्याचे प्रवक्ते तथा पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी देतानाच गोव्याला कसलाही धोका नसल्याचा दावा त्यांनी केला; तर गोव्यात येणारे पर्यटक पळवण्यासाठी गोव्याबाहेरील हॉटेल "लॉबी' अशा प्रकारच्या युक्त्या लढवत असावी, अशी शक्यता राज्याचे गृहमंत्री रवी नाईक यांनी व्यक्त केली आहे.
""दोघा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी रेल्वेमार्गे मुंबईला रवाना झाला असल्याची माहिती आम्हाला गोवा पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वेत सुरक्षेत वाढ केली आहे'' अशी माहिती रेल्वेचे अतिरिक्त सरव्यवस्थापक राज खिलनानी यांनी दिली.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार गोव्यातून रवाना झालेला दहशतवादी मुंबई येथील दादर रेल्वे स्थानकावर एका व्यक्तीला भेटणार आहेत. दुसरा दहशतवादी गोव्यात आहे की नाही, याबद्दल अद्याप कोणतेही माहिती नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोन्ही दहशतवाद्यांची नावे कलिमुद्दीन खान उर्फ रामेश्वर पांडे (२८) व हाफीज खिजीर उल्ला सरिफ (२५) अशी असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे. गेल्या महिन्यात मुंबई पोलिसांनी चतुर्थीच्या काळा मुंबई दोन दहशतवादी घुसले असल्याचा दावा करून या दोन्ही दहशतवाद्यांची छायाचित्रे आणि त्यांची नावे जाहीर केली होती.

मुख्यमंत्र्यांविरोधातच 'मुस्लिमांचो एकवट'

मडगावात कॉंग्रेसचे धाबे दणाणले
मडगाव, दि. ७ (प्रतिनिधी): पालिका निवडणुकांचा प्रश्र्न ज्वलंत बनलेला असताना आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या मतदारसंघात झालेल्या एका आकस्मिक घडामोडीत मडगावातील तमाम मुसलमानांनी एकत्र येऊन मडगाव पालिका निवडणुकीसाठी आपले स्वतंत्र पॅनेल उभा करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे सत्ताधारी कॉंग्रेस बचावाच्या पवित्र्यात आली. आमचा हा निर्णय फक्त पालिका निवडणुकीपुरता मर्यादित नसून आगामी विधानसभा निवडणुकीची ही पूर्वतयारी असल्याचे संकेतही त्यामुळे मिळाले आहेत.
शहरातील विविध मुस्लिम नेत्यांनी आज मालभाट येथे जामा मशिदीच्या सभागृहात घेतलेल्या एका पत्रपरिषदेत ही घोषणा केली. यावेळी शेख इफ्तिकार, शेख महंमद उस्मान, महंमद नझीर, कासीमखान, जामासाब बेपारी, हाजी इब्राहिम, अब्दुल मतीन कारोल व अब्दुल्ला कादर गली यावेळी उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, किमान सात जागांवर मुस्लिम उमेदवार उभे केले जाणार असून त्यांची नावेही पक्की करण्यात आली आहेत. पॅनेलचे नावही ठरलेले आहे. मडगाव पालिका निवडणुकीसंदर्भात सध्या उच्च न्यायालयात असलेल्या याचिकेवर काय निवाडा होतो ते पाहून बहुधा उद्याच त्याची घोषणा केली जाईल.
मुस्लिमांच्यागठ्ठा मतांमुळेच गोव्यात कॉंग्रेसला सत्ता उपभोगता आली ही वस्तुस्थिती आहे; कॉंग्रेसकडून मुसलमानांचा वापर "टिश्यू पेपर' सारखा केला जात आहे. या समाजाला मागासलाच ठेवून केवळ निवडणुकांवेळी भरमसाठ आश्र्वासने द्यावयाची व निवडणुका आटोपताच त्याकडे दुर्लक्ष करायचे हीच आज कॉंग्रेसची कार्यपद्धती बनली आहे. कामत यांच्या कार्यकाळांत त्याला जास्त बळकटी आली, असा आरोप त्यांनी केला.
कॉंग्रेसने धर्मनिरपेक्षतेच्या नावाने मुसलमानांचा केवळ वापर केला असे सांगताना मडगावच्या कब्रस्तानचे त्यांनी उदाहरण दिले. गेली ३० वर्षे त्याच्या नावाने फक्त सत्ता उपभोगण्याचे कारस्थान चालले आहे. गोव्यात कॉंग्रेस फक्त मुसलमानांमुळे सत्तेवर आहे असे सांगून कॉंग्रेसचे सहा ते सात आमदार केवळ मुसलमानांमुळे निवडून येतात हे त्यांनी लक्षात ठेवावे असेही बजावले. सरकारने या समाजाच्या कोणत्याही समस्या सोडवण्याकडे लक्ष दिले नाही. संपूर्ण गोव्यात या लोकांचे समाजगृह नाही, स्वतः च्या शाळा इमारती नाहीत; परंतु हे सगळे विषय बाजूला ठेवून समाजाला सध्या कब्रस्तानचा मुद्दा घेऊन बसावे लागले आहे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांवर त्यांनी मुसलमानांना झुलवत ठेवत असल्याचा आरोप केला. ते मुसलमानांमुळेच मुख्यमंत्री होऊ शकले याचे भान त्यांनी ठेवायला हवे. "सर्वांना नेहमीच मूर्ख बनविता येत नाही,' अशी जी म्हण आहे ती त्यांना तंतोतंत लागू पडते, असे सांगून कब्रस्तानचा प्रश्र्न असाच भिजत राहण्यास तेच जबाबदार असल्याचा संतप्त आरोपही या नेत्यांनी यावेळी केला.
आज विधानसभेत व नगरपालिकेतही मुस्लिम प्रतिनिधी नाही. त्याचमुळे त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असावे याच विचारातून मडगावातील तमाम मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे. या मुद्यावर सर्व मुस्लिम एकत्र आहेत. मडगावातील काही प्रभागात मुस्लिमांचे प्राबल्य असताना ते प्रभाग अन्य जाती वा वर्गांसाठी राखीव ठेवण्याचे घाणेरडे राजकारण मुख्यमंत्री खेळले आहेत व हे आरक्षण, प्रभाग आखणी यासारखी कामे करताना पुरेसा कालावधीही न ठेवता सर्वांवर अन्याय करण्यात आल्याचे ते म्हणाले.
कॉंग्रेसने आता काही ठिकाणी उमेदवारी दिली तर भूमिका काय असेल, असे विचारता मुस्लिम बहुसंख्याक प्रभाग इतरांसाठी राखीव केल्यावर आता प्रतिनिधित्व देण्याचा प्रश्र्नच उद्भवत नाही तसेच झरीना शहा सारख्या मुस्लिम समाजात स्थान नसलेल्यांना उमेदवारी दिल्यानेही समस्या सुटणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. पॅनलबाबत आज रात्री अंतिम निर्णय होऊन उद्या शुक्रवारी नावे जाहीर केली जातील, अशी माहिती त्यांनी दिली.