सुदिन ढवळीकर यांचा संशय
मडगाव, दि. १९ (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस वा "जी - ७' संदर्भात केलेली वक्तव्ये सर्वथा आक्षेपार्ह व सरकारसाठी अत्यंत हानिकारक आहे. त्यांच्या या बेजबाबदार वक्तव्यांबाबत कॉंग्रेसची प्रतिक्रिया अजून स्पष्ट होऊ नये, यावरून त्या पक्षातील कोणाची तरी त्यांना फूस नसावी ना, असा संशय आल्याशिवाय राहत नाही, असे प्रतिपादन आज सकाळी मडगाव येथे वाहतूक तथा समाजकल्याण मंत्री रामकृष्ण ऊर्फ सुदिन ढवळीकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना केले.
समाजकल्याण खात्याच्या इंदिरा बालरथ योजनेखाली मिनिबसेसचे वितरण करण्यासाठी आयोजित कार्यक्रमासाठी येथील रवींद्र भवनात ढवळीकर आले असता त्यांची भेट घेऊन सध्याच्या राजकीय घटनांबाबत त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी हे उत्तर दिले.
ते म्हणाले की, राष्ट्रवादी असो वा म. गो. असो, हे सरकारातील घटक पक्ष आहेत व म्हणूनच कोणाबाबतही जाहीर वक्तव्य करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. हे भान चर्चिल यांनी युतीबाबतचे निवेदन करताना बाळगले नाही व त्यामुळे संपूर्ण सरकारबाबतच चुकीचा संकेत निर्माण झाला आहे. त्यांच्या निवेदनाबाबत अजून कॉंग्रेसने कोणतेही निवेदन देऊ नये हे तर अधिकच आक्षेपार्ह आहे.
परवा "जी- ७' ने मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या भेटीबाबत विचारले असता, आम्ही सर्वांनी मुख्यमंत्र्यांकडे शरद पवार यांचा संदेश पोहोचता केला आहे. आपण दिलेली मुदत संपल्यानंतर हायकमांडच्या निर्णयानुसार पुढील पावले उचलली जातील, असे त्यांनी सांगितले.
या भेटीसंदर्भात मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया काय होती असे विचारता, ते तुम्ही मुख्यमंत्र्यांनाच विचारा असे ते उत्तरले. मात्र "जी- ७' गटातील सर्वजण संघटित व आपल्या भूमिकेशी ठाम आहेत, असे ते म्हणाले.
हा कार्यक्रम आटोपल्यावर मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची भेट घेऊन सरकारच्या स्थैर्याबाबत प्रतिनिधीने सवाल केला असता, इंदिरा बाल रथाप्रमाणेच सरकारही भक्कम आहे, असे सांगून ते मंत्रिमंडळ बैठकीसाठी पणजीला रवाना झाले.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा