पणजी, दि. १९ (प्रतिनिधी) ः आरोग्य खात्यात मलेरिया सर्वेक्षक म्हणून नोकरीला असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आज पणजी शहरात मोर्चा काढून आपल्यावर झालेला अन्याय दूर करण्याची मागणी केली. उद्या दि. १९पासून पणजी जेटी येथे हे सर्व कर्मचारी आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्याप्रमाणे, दि. २४ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजता विधानसभेवर मोर्चा नेण्यात येणार असल्याची माहिती आज मलेरिया कर्मचारी संघाचे अध्यक्ष प्रेमदास शांबा गावकर यांनी सांगितले.
गेल्या चौदा वर्षांपासून आरोग्य खात्यात सेवा बजावलेल्या या कामगारांना अचानक काढून टाकण्यात आले आहे. मंत्र्यांनी आपल्या मर्जीतील लोकांची भरती करण्यासाठी ८७ कर्मचाऱ्यांना एकाएकी कामावरून काढून टाकण्यात आल्याची टीका या कर्मचाऱ्यांनी केली आहे. या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरून आमरण उपोषण करण्याचा निर्धार या कामगारांनी केला आहे.
मध्यंतरी या कामगारांनी सेवेत नियमित करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाला अधिकृतपणे प्रत्येकी ४० हजार रुपयांची देणगीही दिली होती व त्याद्वारे ३१ लाख रुपये जमवण्यात आले होते. मात्र हे पैसे कुणाकडे पोचले याचा मात्र अजूनही थांगपत्ता लागलेला नाही आणि कामगारांच्या नशिबी उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा