ख्रिस्ती समाजाला भाजपचा पर्याय खुला
चर्चसंस्था वक्तव्याशी ठाम
पणजी, दि. १६ (प्रतिनिधी) - ख्रिस्ती समाज हा कदापि भाजपबरोबर जाणार नाही, अशी फुशारकी मारून या समाजाचा केवळ वोटबॅंक म्हणून आत्तापर्यंत वापर करणाऱ्या कॉंग्रेस पक्षाला यंदा लोकसभा निवडणुकीत चांगलीच चपराक मिळाल्याचे सिद्ध झाले आहे. राज्यात दोन्ही ठिकाणी झालेल्या मतदानात यावेळी ख्रिस्ती समाजाने मोठ्या प्रमाणात भाजपला मतदान केल्याचे स्पष्ट झाल्याने कॉंग्रेसची झोप उडाली आहे. या पार्श्वभूमीवर , गोव्यातील ख्रिस्ती समाजाला भाजपशी काहीही वैर नाही,असे यापूर्वी चर्चसंस्थेच्या प्रवक्त्याने केलेल्या वक्तव्याशी चर्च ठाम असल्याचे सांगून या वक्तव्याचा काही स्थानिक प्रसारमाध्यमांनी चुकीचा अर्थ काढून चर्चसंस्थेवर विनाकारण टीका केल्याचेही चर्चने केलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे.
गोव्यातील ख्रिस्ती लोकांना भाजपला मतदान करण्याची पूर्ण मोकळीक आहे, असे वक्तव्य लोकसभा निवडणुकीवेळी रोमन चर्चकडून करण्यात आले होते. या वक्तव्यामुळे तथाकथित निधर्मवादी राजकीय पक्षांचे पित्त खवळल्याने त्यांनी या वक्तव्याबाबत अपप्रचार सुरू केला व त्यामुळे काही स्थानिक प्रसारमाध्यमांतून चर्चसंस्थेवरच आगपाखड करण्यात आली. याप्रकरणी गोवा व दमण आर्चबिशप कार्यालयातून खुलासा करण्यात आला आहे. ख्रिस्ती बांधवांना भाजपला मतदान करण्याची पूर्ण मोकळीक आहे, या वक्तव्याशी चर्च अजूनही ठाम आहे,असे स्पष्ट प्रत्युत्तर टीकाकारांना देण्यात आले आहे.
काही लोकांनी या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला व त्यामुळेच या वक्तव्यावरून गोंधळ निर्माण झाल्याचे या पत्रकांत म्हटले आहे. मुळात केवळ सत्य परिस्थितीची जाणीव होण्यासाठीच हे वक्तव्य करण्यात आले होते. या वक्तव्यात चर्चसंस्थेचे धोरण वगैरे जाहीर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,असेही स्पष्टीकरण यावेळी करण्यात आले. चर्चसंस्था कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधील नाही, ख्रिस्ती बांधवांना गेल्या लोकसभा निवडणुकीत स्वतःची सदसद्विवेकबुद्धी वापरा आणि मतदान करा,असा सल्ला देण्यात आला होता व त्याप्रमाणे त्यांनी मतदान केले,असेही यावेळी सांगण्यात आले. यापूर्वीही ख्रिस्ती समाज बांधवांनी भाजपला मतदान केले होते व त्यामुळेच भाजप सत्तेवरही आला होता, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. केवळ काही स्थानिक प्रसारमाध्यमांनी या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला व चर्चसंस्थेकडून ख्रिस्ती लोकांची दिशाभूल केल्याचा खोटा आरोपही करण्यात आला. राष्ट्रीय एकता व धार्मिक सलोखा मानणाऱ्या कुठल्याही राजकीय पक्षाकडे चर्चसंस्थेचे काहीही वैर नाही, असेही यावेळी सांगण्यात आले होते. कंदहार येथे ख्रिस्ती आदिवासींवर झालेल्या हल्ल्याबाबत गोव्यातील चर्चसंस्थेकडून मोठीशी दखल घेतली गेली नसल्याचा खोटा अपप्रचारही काही स्थानिक प्रसारमाध्यमांतून करण्यात आला. हा आरोप पूर्णपणे निरर्थक आहे. गोव्यातील चर्चसंस्थेने या आदिवासींना मदत पाठवलीच, वरून या लोकांवर झालेल्या अत्याचाराबाबत जागृती निर्माण करण्यासाठी ९० हजार लोकांच्या सह्याही जमवल्या,असेही यावेळी सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा