Monday, 10 November 2008

म्हापसा भागात जोडप्याची गळफास लावून आत्महत्या

म्हापसा दि. १० (प्रतिनिधी) - पावलोवाडो चिखली येथे वेणू गोपाळ (३०) व पत्नी श्रीमती वेणू गोपाळ या दोघांनी गळफास लावून काल रात्री आत्महत्या केली. त्यांना ५ व ४ वर्षांची दोन मुले आहेत. त्यापैकी एकाचे नाव वासू असून दुसऱ्याचे नाव समजू शकले नाही. आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. त्या दिशेने तपास सुरू आहे.
हैदराबाद येथील अपर्णा कर्वे या महिलेने चिखली कामुर्ली येथे एक घर विकत घेऊन ते दुरुस्त केले होते. कर्वे यांनी या घराच्या देखरेखीसाठी वेणू गोपाळ याला दरमहा सात हजार रुपये वेतनावर ठेवण्यात आले होते. काल रात्री एका खोलीत वेणू गोपाळ याने चादरीचे टोक घराच्या वाशाला बांधून आत्महत्या केली; तर त्याच्या पत्नीने घराबाहेरील खोलीत ओढणी वाशाला बांधून आपली जीवनयात्रा संपवली. आज सकाळी दोन्ही मुलांनी आपले आई वडील घरात लटकत असल्याचे पाहून टाहो फोडला. घरात रडारड चालल्याचे पाहून एका पंच सदस्याने तेथे नजर टाकली आणि या घटनेची माहिती तातडीने म्हापसा पोलिसांना दिली.
पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील, उपनिरीक्षक ब्रन्डटन व केसरकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथे गोमेकॉ इस्पितळात पाठवून दिले. या जोडप्याच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. सोन्यासारखी मुले आता पोरकी झाल्याने गावातील लोक हळहळ व्यक्त करीत आहेत.

No comments:

Post a Comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा