दिल्ली, लखनौ आणि चंदीगडमध्येही हिंसाचार
खोऱ्यात पोलिस गोळीबारात 12 ठार, अनेक जखमी
काश्मिरातील सर्वच दहाही जिल्ह्यांत संचारबंदी
लखनौमध्ये भाजपाचे "जेल भरो' आंदोलन
श्रीनगर, 12 ऑगस्ट :अमरनाथ देवस्थानची जमीन परत करा या मागणीसाठी आज केवळ जम्मू-काश्मीरच नव्हे तर, राजधानी दिल्ली, लखनौ आणि चंदीगड या शहरांमध्येही तीव्र आंदोलन करण्यात आले. अमरनाथ जमिनीचा मुद्दा आणि काल गोळीबारात पाच जण ठार झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण जम्मू आणि काश्मीर पेटून उठले आहे. सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करीत दगडफेक करणाऱ्या आंदोलकांना रोखण्यासाठी सुरक्षा जवानांनी आज पुन्हा गोळीबार केला. यात 12 जण ठार झाले असून, अनेक जण जखमी झाले. दरम्यान, काश्मीर खोऱ्यातील पेटलेली स्थिती लक्षात घेऊन संपूर्ण खोऱ्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
बांदीपुरा जिल्ह्यातील अरिबल येथे गोळीबारात चार जण ठार आणि आठ जण जखमी झाले आहेत. तर, श्रीनगरच्या बाहेरील लसजन भागात झालेल्या गोळीबारात दोन जण ठार झाले आहेत, अन्य एका ठिकाणी तिघांचा मृत्यू झाला, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. किश्तवारमध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला असून, काही जण जखमी झाले आहेत.
काल पाकव्याप्त काश्मिरातील मुझफ्फरपूरकडे निघालेल्या फळ विक्रेत्यांना रोखण्यासाठी जवानांनी गोळीबार केला होता. यात हुरियत नेते अब्दुल अजिझ यांच्यासह पाच जण ठार झाले होते तर, सुमारे 150 जण जखमी झाले होते. या घटनेच्या निषेधार्थ शेकडो निदर्शकांनी आज खोऱ्यात धूडगुस घातला. दगडफेक आणि जाळपोळ करीत निघालेल्या आंदोलकांना पांगविण्यासाठी लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर अपयशी ठरल्यानंतर जवानांनी गोळीबार केला.
दरम्यान, काश्मीर खोऱ्यातील स्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून प्रशासनाने संपूर्ण खोऱ्यात संचारबंदी लागू केली आहे. संपूर्ण काश्मीर खोऱ्यात संचारबंदी लागू करण्याची गेल्या 13 वर्षांच्या काळातील ही पहिलीच वेळ आहे.
आंदोलकांचा हिंसाचार मोडून काढण्यासाठी लष्कराला सर्व प्रकारचे अधिकारही देण्यात आले आहेत, असे सूत्रांनी म्हटले आहे.
किश्तवारमध्ये 2 ठार;
लष्कराला पाचारण
संचारबंदी असलेल्या किश्तवारमध्ये घडलेल्या हिंसाचारात आणि पोलिस गोळीबारात 2 जण ठार झाले असून, 20 जण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या भागात लष्कराला पाचारण केले आहे. हुरियत नेत्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने आंदोलकांनी एकत्र येऊन जवानांशी संघर्ष केला. दगडफेक करणाऱ्यांवर पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. 15 जण जखमी झाल्यानंतर आंदोलन आणखीच भडकले. स्थिती चिघळत असल्याचे पाहून पोलिसांच्या मदतीला अखेर लष्कराला बोलावण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा