पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): किरणोत्सर्गाचा धोका लक्षात घेऊन गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘एमपीटी’ व पणजी बंदरात जपानमधून आलेल्या जहाजांना बलास्ट पाणी समुद्रात न सोडण्याचे आदेश जारी केल्याची माहिती मिळाली आहे. या आदेशावरून जपानमधून आलेल्या जहाजाला बंदरापासून दूरवर नांगर टाकण्यास सांगितल्याचेही कळते.
जपान बंदरातून निघालेली दोन जहाजे गोव्यात दाखल होणार असल्याची माहिती मिळताच राज्य विज्ञान व पर्यावरण खात्याने तात्काळ आदेश जारी करून गोव्यातील दोन्ही महत्त्वाच्या बंदरांना सतर्कता बाळगण्यास सांगितले. जपानात किरणोत्सर्गाचा प्रभाव वाढल्याने त्याचा परिणाम गोव्यात होण्याची शक्यता गृहीत धरूनच ही काळजी घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे किरणोत्सर्गाच्या पाण्याची तपासणी करण्याची यंत्रणा नाही व त्यामुळे केवळ सावधानी बाळगणेच हाती असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, या जहाजांमुळे किरणोत्सर्गाचा धोका नाही अशा आशयाचे आंतरराष्ट्रीय मरीटाइम संघटनेकडून मिळवलेले पत्रच सदर जहाजांनी मंडळाला सादर केले असून भीती बाळगण्याचे कारण नाही, असे स्पष्ट केले आहे. या जहाजातील बलास्ट पाणी यापूर्वी सिंगापूर येथे सोडण्यात आले होते व गोव्यात नव्याने पाणी भरण्यात आल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा