वास्को, दि. १४(प्रतिनिधी)ःखारीवाडा येथील ६६ घरांवर बुलडोझर फिरवण्यात आल्यानंतर आता येथील अन्य घरांवर तरी कारवाई होऊ नये यासाठी गुरुवार मध्यरात्रीपासून येथे ‘बंद’ पुकारण्यात आला आहे. आज रात्री १२ वाजल्यानंतर येथे असलेले सर्व मच्छीमार ट्रॉलर, नौका तसेच मासळी मार्केट ‘बंद’ होणार असून या घरांवरील कारवाई जोपर्यंत टाळली जात नाही तोपर्यंत हा ‘बंद’ पाळण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
‘खारीवाडा अफेक्टेड पीपल्स’ समितीच्या झेंड्याखाली हा ‘बंद पुकारण्यात आला असून मुरगाव तालुक्यातील सुमारे ३५० मच्छीमार ट्रॉलर, नौका तसेच येथील मासळी मार्केटातील व्यवसाय करणारे सर्वजण यात सहभागी होणार आहेत. ‘गोवा फिशिंग बोट ओनर्स’ संघटनेचे अध्यक्ष सायमन परेरा यांनी सांगितले की, या ‘बंद’मध्ये मुरगावातील फक्त मच्छी व्यवसायात असलेले लोकच सहभागी होणार आहेत. सर्व ट्रॉलर व नौकांवर ‘बंद’च्या दरम्यान काळे झेंडे फडकवण्यात येणार अशी माहितीही मिळाली आहे.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा