इंग्लंडने काढला भारताचा घामटा!
बंगलोर, दि. २७ : कधी आशा तर कधी निराशा, चिन्नास्वामी स्टेडियममध्ये एकवेळ तर असे चित्र दिसत होते की, आता इंग्लंडचा विजय केवळ औपचारिकताच ठरणार. मात्र महेंद्रसिंग धोनीच्या धुरंधरांनी शेवटपर्यंत चिवट इच्छाशक्ती दाखवली आणि विजयाची आस सोडली नाही. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या ‘ब’ गटातील साखळी लढतीत अखेर दोन्ही संघांच्या बाजूने दान पडले आणि हा सामना अखेर ‘टाय’ झाला. बरोबरीत सुटलेल्या या लढतीत उभय संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.
अंगावर रोमांच उमटणे म्हणजे काय याचा थरारक अनुभव जगभरातील क्रिकेटप्रेमींनी या लढतीद्वारे घेतला.
पहिल्यांदा फलंदाजी करताना या लढतीत भारताने ४९.५ षटकांत ३३८ धावा झोडल्या. त्यात सचिन तेंडुलकर याने झळकावलेल्या शानदार शतकाचा उल्लेख प्रामुख्याने केलाच पाहिजे. मात्र या सामन्याला सर्वार्थाने कलाटणी दिली होती ती झहीर खान याने. तथापि, जिगरबाज इंग्लंडने हा सामना बरोबरीत सोडवून भारताला विजयाचे समाधान मिळू दिले नाही. खेळपट्टीत धावा ठासून भरल्याचे सुरुवातीपासूनच जाणवत होते. तो अंदाज भारताने खरा ठरवला. दाद द्यावी लागेल ती जिगरबाज इंग्लंडला. त्यांनीसुद्धा खचून न जाता भारताला तेवढेच जोरकस उत्तर दिले. सामना रंगला असे म्हटले जाते त्याचा जिवंत पुरावा म्हणजे चिन्नास्वामी स्टेडियमवरील क्रिकेटमय युद्ध! (सविस्तर वृत्त पान १० वर)
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा