डेमोक्रॅटिक फ्रंटच्या बैठकीत
नार्वेकरांचे पुन्हा शरसंधान
पर्वरी, दि. २१ प्रतिनिधी : सरकारच्या गलथान कारभारामुळे गोव्यात अमली पदार्थांची खुलेआम विक्री होत आहे; वेश्या व्यवसायाला ऊत आला असून राज्यात दिवसाढवळ्या खून, मारामार्या, दंगली होत आहेत. खाण व्यावसायिकांना कुणाचाही धरबंध राहिलेला नसल्याने संपूर्ण गोवाच पोखरला जात आहे. सरकारने हे प्रकार वेळीच थांबवले नाहीत तर तर याचे गंभीर दुष्परिणाम भावी पिढीला भोगावे लागतील आणि ही पिढी सरकारला कधीही माफ करणार नाही, असा इशारा ऍड. दयानंद नार्वेकर यांनी पुन्हा दिला आहे.
येथील स्पोर्टस् क्लबच्या सभागृहात गोवा मोक्रॅटिक फ्रंटने आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष एडवर्ड डीलिमा, पंच बडेसाब, रेश्मा आमोणकर, उमेश फडते, जॉन पॉल वालीस, वेरोनिका अल्बुकर्क, गुपेश नाईक आदी मान्यवर हजर होते.
गृहखाते निष्क्रिय झाल्यामुळे ड्रग माफियांना गोव्यात मोकळे रान मिळाले आहे. पोलिस स्वत:च अमलीपदार्थाच्या व्यवसायात गुंतले आहेत. जर कुंपणच शेत खायला लागले तर दाद कोणाकडे मागणार हा यक्षप्रश्न आहे, असे नार्वेकर पुढे म्हणाले.
खाण व्यावसायिकांनी संपूर्ण गोवा गिळंकृत केला आहे. त्यामुळे येथील शेती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. खाण व्यावसायिक गोव्यातून कोट्यवधी रुपये घेऊन जात आहेत व गोवेकरांसाठी त्या बदल्यात धूळ आणि माती सोडत आहेत. या व्यवसायामुळे या बागातील नागरिकांचे आयुर्मान झपाट्याने कमी होत आहे. मात्र या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्यास सरकारकडे वेळ नाही. नजीकच्या काळात बार्देश तालुक्यात सात नवीन खाणींना परवानगी देण्याचा घाट सरकारने घातला असल्याची माहितीही नार्वेकर यांनी यावेळी दिली.
म्हापसा येथे २००७ साली नवीन जिल्हा इस्पितळ बांधून तयार झाले आहे. मात्र अजून त्याचे उद्घाटन करण्याचा मुहूर्त सरकारला सापडत नाही. कारण या इस्पितळाचे खाजगीकरण करण्याचा संबंधितांचा डाव आहे. तसे झाल्यास सामान्य नागरिकांना या इस्पितळाचा कोणताही लाभ होणार नाही, असे सांगतानाच या सर्व बाबींवरून सरकारची वाटचाल कोणत्या दिशेने होत आहे याची कल्पना लोकांना येऊ शकेल असे ते म्हणाले. विशेष म्हणजे या सर्व प्रकरणांवरून लोकांनी एकत्र येऊन सरकारविरोधात आवाज उठवण्याची वेळ आली आहे, असेही नार्वेकर म्हणाले.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा