१५ मार्चपासून सर्व सेवा उपलब्ध
पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): म्हापसा पेडे येथे बांधलेले जिल्हा इस्पितळ खाजगी भागीदारीवरच चालवण्यात येणार असून विरोधक व इतर काही आमदार जी वक्तव्ये करत आहेत त्याची आपणास पर्वा नाही, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आज येथे केले.
म्हापसा इस्पितळाच्या खाजगीकरणाविरोधात सत्ताधारी व विरोधक आमदारांनी चालवलेल्या आंदोलनासर्ंदभात आरोग्यमंत्र्यांनी आज २७ रोजी कांपाल येथे आरोग्य खात्याच्या परिषद कक्षात पत्रपरिषद आयोजिली होती. ते म्हणाले की, 'पीपीपी' म्हणजे काय ते न समजणारेच जास्त ओरड करत आहेत. म्हापसा येथील इस्पितळ 'पीपीपी' धर्तीवरच सुरू होणार असून बांबोळी येथे असलेल्या सर्व सेवा या इस्पितळात उपलब्ध असतील. तसेच गोव्यातील लोकांना येथे जी आझिलो इस्पितळात फी आकारली जात होती तेवढीच ती जिल्हा इस्पितळातही आकारली जाईल. राजकीय नेत्यांनीच आधी या 'मॉडेल' इस्पितळाचा अभ्यास करावा व मगच काय ते बोलावे.
याप्रसंगी 'पीपीपी सेल'चे प्रमुख अनुपम किशोर यांनी म्हापसा जिल्हा इस्पितळ मार्चच्या १५ तारखेपासून सुरू होणार असल्याचे सांगून 'पीपीपी'मुळे गोवेकरांना कोणताही त्रास होणार नाही असे प्रतिपादन केले. यावेळी आरोग्य सचिव राजीव वर्मा, संचालिका डॉ. राजनंदा देसाई, 'गोमेकॉ'चे डीन डॉ. व्ही. एन. जिंदाल उपस्थित होते.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा