लोहिया मैदानावरील जाहीर चर्चासत्रातील सूर
मडगाव, दि. ३० (प्रतिनिधी): मुक्तीनंतरच्या गेल्या पन्नास वर्षांत गोव्याचे जे सामाजिक, राजकीय, आर्थिक व नैतिक अधःपतन झालेले आहे; आपल्याच राज्यात आपणच अल्पमतात येण्याची जी पाळी गोमंतकीयांवर आली आहे, त्याला बेजबाबदार राजकारण्यांएवढेच मतदानाचा हक्क न बजावणारे मतदारही कारणीभूत असल्याचा स्पष्ट आरोप आज येथील लोहिया मैदानावर आयोजित जाहीर चर्चासत्रातून करण्यात आला. ही परिस्थिती बदलावयाची असेल तर या भूमीशी निष्ठा असलेल्या युवकांनी पुढे येण्याची गरज आहे, असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
गोवा क्रॉनिकल ह्या वेबसाईटतर्फे आयोजित ‘मुक्ती सुवर्ण महोत्सव ः स्वर्ग साध्य केला की नंदनवन गमावले’ या विषयावर आयोजित सदर चर्चासत्रात व्यासपीठावर म. गो.चे आर. एस. म्हार्दोळकर, राष्ट्रवादीचे व्यंकटेश मोनी, युगोडेपाचे डॉ. जोर्सन फर्नांडिस, भाजपचे आमदार दामू नाईक व कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष एम. के. शेख उपस्थित होते. यावेळी स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली, माजी मंत्री माथानी सालढाणा, डॉ. किरण बुडकुले, मोहनदास लोलयेकर, सुनील शेट्ये, कु. मिलिसा सुआरीस, नाझारियो पिंटो, परेश देसाई, डॉ. ह्युबर्ट गोम्स यांनीही आपले विचार मांडले.
कोणतेही सरकार गोव्याच्या विकासाला निश्चित दिशा देऊ शकले नाही याचे कारण त्यांच्यासमोर कोणतेही ठोस धोरण नव्हते असे स्पष्ट मत यावेळी नागेश करमली यांनी नोंदवले. सुरुवातीची सरकारे वेगवेगळ्या वादांतच गुरफटून राहिली व त्यामुळे गोवा व त्याचबरोबर गोमंतकीय यांची सतत फरफट चालू राहिली. मुक्तीच्या पन्नासाव्या वर्षांतही ही परिस्थिती बदललेली नाही, असे ते पुढे विषादाने म्हणाले.
माजी मंत्री माथानी सालढाणा यांनी गोव्याच्या राजकारणावर विविध प्रकारच्या लॉबींचा दबाव राहिल्यामुळेच राज्याचा विकास झाला तरी त्याला योग्य ती दिशा मिळू शकली नसल्याचे सांगितले. विद्यमान सरकार दोनापावला ते वास्को किंवा बांबोळी - वास्को असा जो सी लिंक उभारू पाहते आहे त्यामागे सावंतवाडीजवळ कुडाळ येथे उभ्या राहणार असलेल्या वीज प्रकल्पासाठीच्या कोळसा वाहतुकीची सोय करणे हाच प्रमुख हेतू आहे; त्यासाठी एक लॉबी कार्यरत आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला. सरकारच्या सदोष धोरणांमुळेच गोमंतकीय झपाट्याने अल्पसंख्याक बनत चालला आहे व त्यामुळे स्वातंत्र्याचे स्वप्नच फसले आहे, असे ते म्हणाले.
गेल्या पन्नास वर्षांत विविध कारणास्तव गोमंतकीय अस्वस्थ बनत चालला आहे व त्याची अस्वस्थता वाढत चालली आहे असे प्रतिपादन यावेळी डॉ. किरण बुडकुले यांनी केले. त्या म्हणाल्या की, राजकारणात मूल्ये शिल्लक राहिलेली नाहीत व त्यामुळे कोणालाच कसलेच विधिनिषेध राहिलेले नाहीत. नागरिकांनी राजकारण्यांचे मिंधे न बनता जो भ्रष्ट असेल त्याला धडा शिकविण्याची गरज त्यांनी प्रतिपादिली. मोहनदास लोलयेकर यांनी म. गो. राजवटीने आणलेल्या पुरोगामी कायद्यामुळेच गोव्यातील बहुजन समाज आज ताठ मानेने उभा असल्याचे सांगितले. त्यांनी कोमुनिदाद व देवस्थान कायद्यात काळानुसार बदल करण्याचे धाडस एकही सरकार दाखवू शकले नसल्याचे सांगितले. १९८० नंतरच्या गोव्यातील राजकीय अधःपतनास संपूर्णतः कॉंग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. मनोहर पर्रीकरांखेरीज अन्य कोणीच गोव्यात चांगले प्रशासन देऊ शकले नसल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
नंतर राजकीय पक्षांच्या वतीने बोलताना आमदार दामू नाईक यांनी भाजप गोव्यात कोणत्या प्रकारचे कार्य करू शकतो ते त्याने आपल्या साडेपाच वर्षांच्या कार्यकाळांत दाखवून दिले असल्याचे सांगितले. भाजपने गोव्याला स्वच्छ प्रामाणिक व पारदर्शी प्रशासन दिले असे सांगतानाच भाजपचा तो कार्यकाळ व त्याने केलेले कार्य हाच त्या पक्षाचा ‘ट्रेलर’ मानून तो पटत असेल तर आगामी निवडणुकीत लोक त्याला सत्तेप्रत नेतील असेही ते म्हणाले. गेल्या पन्नास वर्षार्ंंपैकी फक्त साडेपाच वर्षे भाजपच्या वाट्याला आली; त्यातही अनेक मर्यादा असताना भाजपने अनेक नव्या योजना राज्यात राबविल्या. मात्र २६ वर्षांहून अधिक काळ सत्ता आपल्याकडे राखलेल्या कॉंग्रेसने या सत्तेचा लाभ लोकांपर्यंत पोहोेचविला नाही; उलट गोव्याला आजच्या स्थितीला कॉंग्रेसच जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला.
म. गो.चे म्हार्दोळकर यांनी म. गो. पुन्हा सत्तेत आला तर ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे आपले धोरण राबवील असे सांगितले तर व्यंकटेश मोनी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आगामी निवडणुकांत सर्व ४० ही जागा लढवून आपले वेगळे अस्तित्व दाखवून देणार असल्याचे सांगितले. कॉंग्रेसचे एम. के. शेख यांनी आपला पक्ष ‘भांगराळे गोंय’ साठी वचनबद्ध राहील, अशी ग्वाही दिली.
व्हेबसाईटचे साव्हियो गोम्स यांनी कार्यक्रमामागील उद्देश सांगितला व शेवटी आभार मानले. ज्युलियो डिसिल्वा यांनी सूत्रसंचालन केले.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा