पणजी, दि.१३(प्रतिनिधी): गोवा मुक्तिदिनाचा सुवर्णमहोत्सव दिवाळी व नाताळाप्रमाणेच मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्ष प्रदेश समितीने घेतला आहे. राज्यात विविध ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी आपापल्या कल्पनेप्रमाणे कार्यक्रमांची आखणी केली आहे. हे कार्यक्रम पक्षाच्यावतीने जरी साजरे होणार असले तरी त्यात समस्त गोमंतकीय जनतेला सामावून घेण्याचा पक्षाचा मनोदय आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार प्रा.लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिली.
आज येथे बोलावलेल्या खास पत्रकार परिषदेत प्रा.पार्सेकर यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेश सरचिटणीस प्रा. गोविंद पर्वतकर हजर होते. प्रदेश भाजप समितीची यासंदर्भात अलीकडेच व्यापक बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध ठिकाणी आयोजित केल्या जाणार्या कार्यक्रमांची रूपरेषा ठरवण्यात आली. १८ रोजी पूर्वसंध्येला मशाल मिरवणुका व १९ रोजी पहाटे प्रभातफेर्यांचे आयोजन राज्यभरात केले जाणार आहे. या कार्यक्रमांत युवा व महिलावर्गातला सहभागी करून घेतले जाईल. या महोत्सवाच्या निमित्ताने स्वातंत्र्यसैनिकांचाही गौरव करण्याचे पक्षाने ठरवले आहे. ज्या ठिकाणी हुतात्मा स्मारके आहेत तेथे हे कार्यक्रम होतील.
गोवा मुक्तिसंग्रामाचा इतिहास लोकांसमोर ठेवण्यासाठी खास वक्त्यांना आमंत्रित केले जाणार असल्याचेही प्रा.पार्सेकर म्हणाले.या महोत्सवाला लोकोत्सवाचे स्वरूप प्राप्त करून देण्याचाही निर्णय भाजपने घेतला आहे.
सरकारी पातळीवर शुकशुकाट
या सुवर्णमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारी पातळीवर पूर्ण शुकशुकाट दिसत असल्याचा टोला प्रा.पार्सेकर यांनी हाणला. या महोत्सवासाठी केंद्रांने राज्याला दोनशे कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. कदाचित राज्य सरकार या पॅकेजची वाट पाहत असेल,अशी खिल्लीही त्यांनी उडवली. राज्य सरकारने या महोत्सवानिमित्त नव्या घोषणा करू नयेत. यापूर्वी केलेल्या व कालांतराने हवेत विरलेल्या घोषणांची पूर्तता करण्याचे जरी प्रयत्न केले तरी जनता समाधान मानेल, अशा शब्दांत त्यांनी सरकारची खिल्ली उडवली.
भानगडींचा पोलखोल
राज्यातील विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारच्या असंख्य भानगडींचा या सुवर्णमहोत्सवी वर्षांच्या कार्यकाळात पोलखोल करण्यात येणार असल्याचे प्रा.पार्सेकर म्हणाले. गोवा मुक्तिदिनाचा सुवर्णमहोत्सव साजरा होत असतानाच या काळात सरकारचे अनेक गैरप्रकार व भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा उलगडा केला जाणार आहे.एकार्थाने सामाजिक जागृतीचाच एक भाग म्हणून ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहितीही प्रा.पार्सेकर यांनी दिली.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा