पोर्तुगीजधार्जिण्यांकडून साग्रेसला निरोप
रॅलीबाबत देशभक्तांकडून निषेध
वास्को, दि. १६ (प्रतिनिधी): पोर्तुगीज राजवटीच्या पाचशे वर्षांपूर्वीच्या आठवणी साजऱ्या करण्यासाठी गोव्यात दाखल झालेल्या "साग्रेस'च्या विरोधात राष्ट्रभिमान्यांनी केलेल्या निदर्शनानंतर आज या जहाजाला निरोप देऊन काहीजणांनी पोर्तुगीज ध्वजांसह वास्को शहरात मिरवणूक काढली. राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांनी या जहाजावरील आमंत्रण नाकारलेले असताना, जहाजाला निरोप देऊन पोर्तुगिजांचा उदोउदो करत मिरवणूक काढण्याचा प्रकार निंदनीय आहे. अशा प्रकारच्या अराष्ट्रीय वृत्तीवर लगाम लावणे ही सरकारची जबाबदारी असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी सदर घटनेनंतर दिली.
पाच दिवसांपूर्वी पोर्तुगीज सरकारचे "एन.आर.पी साग्रेस' हे जहाज गोव्याच्या मुरगाव बंदरावर दाखल झाल्यानंतर "मुरगाव देशप्रेमी संघटना' तसेच इतर काही संघटनांनी त्याविरुद्ध निदर्शने केली होती. गोव्यावर कब्जा करून पोर्तुगिजांना पाचशे वर्षे पूर्ण होत असून त्या आठवणी साजऱ्या करण्यासाठी सदर जहाज गोव्यात दाखल झाल्याचे निदर्शने केलेल्या राष्ट्रभिमान्यांनी उघड केले होते. या घडामोडींची दखल घेत राज्यपाल तथा मुख्यमंत्र्यांनी सदर जहाजावरील मेजवानीला उपस्थित राहण्याचे टाळले होते.
मात्र, आज सकाळी "साग्रेस' परतीच्या मार्गावर निघाले असता खारीवाडा तसेच इतर काही भागातील लोकांनी होड्या तसेच ट्रॉलर्समधून जाऊन त्यांना निरोप दिला. सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास खारीवाडा येथील ५ मच्छीमार ट्रॉलर व ३० होड्यांच्या ताफ्यासहित येथील काही नागरिकांनी "साग्रेस' जहाजासमोर जाऊन त्यांना निरोप दिला. यानंतर पोर्तुगिजांच्या बाजूने घोषणा देऊन शहरातून दुचाक्यांवरून मिरवणूक काढली. यावेळी बहुतांश लोकांनी पोर्तुगिजांचा ध्वज तसेच ध्वजचिन्ह असलेले कपडे घातले होते.
अनेक नागरिकांच्या हाती दारूच्या बाटल्या व तोंडी "व्हिव्हा पोर्तुगाल' असे शब्द होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. पोर्तुगीज जहाजाला निरोप देण्यासाठी गेलेल्यांपैकी सायमन परेरा व्यावसायिकाने, सदर जहाज "गुडविल व्हिजिट'साठी आल्याने आम्ही त्यांना निरोप देण्यासाठी गेलो होते, असे सांगून ते आमचे अतिथी होते, अशी प्रतिक्रिया दिली. मात्र, शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत आपला सहभाग नसल्याने त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला.
दरम्यान, ४५० वर्षे गोव्यावर राज्य केल्यानंतर त्या आठवणी साजऱ्या करण्यासाठी आलेल्या जहाजाला निरोप देऊन त्यांचेच गोडवे गाण्याच्या या प्रकाराबाबत देशप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
--------------------------------------------------------
ज्या पोर्तुगिजांनी गोमंतकीयांवर ४५० वर्षे अत्याचार केले, त्यांचे ध्वज घेऊन मिरवणूक काढणे ही एकदम लज्जास्पद गोष्ट आहे. आपल्या देशाचा व राज्याचा अभिमान बाळगण्याचे सोडून दुसऱ्यांचा अभिमान बाळगण्याच्या अशा प्रकारांवर बंदी घातली पाहिजे. भविष्यात असे प्रकार घडू नये यासाठी सरकारने हालचाली करण्याची गरज व्यक्त करताना, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी या प्रकाराचा निषेध केला.
"साग्रेस' जहाजाला निरोप दिल्यानंतर येथील काही नागरिकांनी अंगावर पोर्तुगिजांचा ध्वज असलेले कपडे परिधान करून संपूर्ण शहरात दुचाकीने मिरवणूक काढली. आपण गोमंतकीय कमी आणि पोर्तुगीज जास्त असल्याचा देखावा करणे म्हणजे आगामी पिढीच्या मनातील राष्ट्रभिमान कलुषित करण्याचाच प्रकार असल्याचे श्री. आर्लेकर म्हणाले.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा