बॅंगलोर, दि. १२ : कधीकाळी जागतिक क्रिकेटवर अनिर्बंध सत्ता गाजवणाऱ्या मग्रूर कांगारूंना आज बॅंगलोर कसोटीत चारी मुंड्या चीत करून टीम इंडियाने सध्या कसोटी क्रिकेटचे आपणच "बेताज बादशहा' असल्याचा डंका पुन्हा एकदा दशदिशांना घुमविला. सचिन तेंडुलकरने नाथन हॉरित्झला पॅडल स्वीपचा फटका मारून दोन धावा पूर्ण केल्या आणि तब्बल ३१ वर्षांनी भारताकडून पुन्हा एकदा "व्हाईट वॉश' पत्करण्याची नामुष्की कांगारूंवर ओढवली. अलीकडच्या काळातील ऑस्ट्रेलियाचा हा सर्वांत मानहानिकारक पराभव ठरला आहे.
वीरेंद्र सेहवाग लवकर बाद झाल्यानंतर नवोदित मुरली विजय आणि पदार्पणवीर चेतेश्वर पुजारा यांनी केलेली अर्धशतकी भागीदारी आणि नंतर मास्टर ब्लास्टरने ठोकलेले अर्धशतक याच्या बळावर कांगारूंनी ठेवलेले २०७ धावांचे लक्ष्य चौथा डाव आणि पाचवा दिवस असतानाही भारताने लीलया सर केले.
दरम्यान, सबंध मालिकेत सातत्यपूर्ण फलंदाजी करणाऱ्या सचिनला सामनावीर आणि मालिकावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले असले तरी त्याने मात्र या विजयाचे श्रेय संपूर्ण संघालाच दिले. नवोदित आणि बुजुर्ग खेळाडूंनी केलेल्या सांघिक कामगिरी मुळेच हा अविस्मरणीय विजय साकार झाल्याचे तो म्हणाला.
मोहालीतील पहिल्या कसोटीत व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि ईशांत शर्मा यांनी निर्णायक भागीदारी करून ऑस्ट्रेलियाच्या दाढेतील विजय खेचून आणला होता. आज मात्र टीम इंडियाने कांगारूंना कुठलीही संधी न देता सात गडी राखून आरामात विजय मिळवला व मालिका २-० अशी खिशात टाकली.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा