नवी दिल्ली, दि. २६ : काश्मीरच्या स्वातंत्र्याची मागणी करणारे हुरियत कॉन्फरन्सच्या कट्टरतावादी गटाचे नेते सईद अली शाह गिलानी तसेच या मागणीला आपला पाठिंबा व्यक्त करणाऱ्या वादग्रस्त लेखिका अरुंधती रॉय यांना राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात यावी, अशी मागणी भाजपने केली असून केंद्रीय कायदा मंत्री वीरप्पा मोईली यांनीही या दोघांना चांगलेच झापले आहे. पण, मत व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्याचाही त्यांनी पुनरुच्चार केल्याने केंद्राची तूर्तास तरी मूक भूमिकाच दिसून येते.
काश्मिरी लोकांनी केलेल्या स्वातंत्र्याच्या मागणीला आपण जो पाठिंबा दिला आहे, त्याचे अरुंधती रॉय यांनी पुन्हा एकदा समर्थन केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काश्मीर खोऱ्यात दररोज लाखो लोक जी मागणी करत आहेत त्याकडे मी लक्ष वेधले आहे एवढेच, असे त्या म्हणाल्या. या दोघांविरोधात काय कारवाई करणार यासंदर्भात कोणताही खुलासा न करता कायदा मंत्री मोईली म्हणाले की, या दोघांनी जी काय वक्तव्ये केली आहेत, ती अतिशय दुर्दैवी आहेत. पण, आपल्या देशात मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असल्याने लोकांच्या राष्ट्रीय भावनांना यामुळे धक्का पोचू शकत नाही.
राष्ट्रविरोधी भावनांना धक्का पोचविणाऱ्या या दोघांच्या प्रक्षोभक वक्तव्यानंतरही सरकार अद्यापही मूकदर्शक बनलेले आहे, असा आरोप करून भाजपने म्हटले आहे की, या प्रकरणात कोणत्याही प्रकारे राजकारण आणू नये. राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली या दोघांविरोधात गुन्हा नोंदविला जाऊ शकतो का, अशी विनंती गृहमंत्रालयाने आपल्या मंत्रालयाकडे केली आहे का असे विचारले असता कायदा मंत्री म्हणाले की, गेल्या तीन दिवसांपासून आपण मंत्रालयापासून दूर असल्याने या काळात आपण कोणतीही फाईल बघितलेली नाही.
काश्मीर हा कधीच भारताचा अविभाज्य भाग नव्हता. हे ऐतिहासिक सत्य आहे. इतकेच नाही तर भारत सरकारनेही हे मान्य केलेले आहे, असे विधान वादग्रस्त लेखिका अरुंधती रॉय यांनी केलेले आहे. तर दुसरीकडे दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या "आझादी-द ओन्ली वे' या कार्यक्रमात गिलानी यांच्यासोबत अरुंधती रॉय तसेच माओवादीसमर्थक नेते वरा वरा राव हेही व्यासपीठावर उपस्थित होते. याच कार्यक्रमात भारतविरोधी वक्तव्य करणाऱ्या गिलानींच्या विरोधात एका गटाने घोषणा केल्या होत्या तसेच एकाने त्यांच्या दिशेने जोडाही भिरकावला होता.
श्रीनगर येथून जारी केलेल्या एका निवेदनात रॉय यांनी आपला आवाज दाबण्याच्या प्रयत्नांचा जोरदार विरोध करीत म्हटले आहे की, आपले विचार व्यक्त करू न देणाऱ्या देशाची आपल्याला कीव येते. स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्यांना तुरुंगात पाठविले जाते; परंतु जातीयवादी हिंसाचार करणाऱ्यांना, सामूहिक हत्याकांड घडवून आणणाऱ्यांना, कंपन्यांमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांना, बलात्कार, लुटालूट करणाऱ्यांना सरकार हात लावत नाही, याकडे रॉय यांनी निवेदनात लक्ष वेधले आहे. रॉय यांनी गेल्या काही दिवसांत दिल्ली व श्रीनगर येथे दोन भाषणे केली. या दोन्ही भाषणांत त्यांनी काश्मीर भारतापासून स्वतंत्र करण्यावरच जोर दिला होता. राष्ट्रद्रोही वक्तव्ये केली म्हणून आपल्याला अटक करण्यात यावी, असे मी वृत्तपत्रात वाचले असे सांगून त्या पुढे म्हणतात, काश्मीर खोऱ्यातील लोक दररोज जे काय म्हणतात तेच मी सांगितले. इतर वक्त्यांनी व लेखकांनी गेल्या अनेक वर्षांपासून जे काय लिहिले आहे व आपले विचार व्यक्त केले आहेत तेच मीही व्यक्त केले आहेत.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा