पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): वाळपई मतदारसंघासाठी पोट निवडणुका घोषित झाल्याने आणि काल रात्रीपासून आचारसंहिता लागू झाल्याने उद्यापासून बेमुदत पुकारण्यात आलेले सरकारी कर्मचाऱ्यांचे "लेखणी बंद-काम बंद' आंदोलन स्थगित ठेवण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष मंगलदास शेटकर यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी येत्या पंधरा दिवसांत यावर तोडगा काढणार असल्याचे दूरध्वनीवरून आश्वासन दिल्याचे श्री. शेटकर यांनी सांगितले. आचारसंहिता संपुष्टात येईपर्यंत आम्ही हे आंदोलन स्थगित ठेवत असल्याचे श्री. शेटकर यांनी सांगितले. दिल्लीत गेलेले मुख्यमंत्री कामत यांनी आज सकाळी दोनवेळा मोबाईलवर संपर्क साधून येत्या पंधरा दिवसांत यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. मुख्य सचिवांनी संघटनेच्या मागण्यांवर अभ्यास करून सादर केलेल्या अहवालाची प्रत देण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच, त्या अहवालाचा नव्याने अभ्यास करण्यासाठी कायदा सचिव प्रमोद कामत यांची विशेष अधिकारी म्हणून नेमणूक केली जावी, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची माहिती श्री. शेटकर यांनी दिली.
दरम्यान, सरकारने या बंदमध्ये सहभागी होणाऱ्या कामगारांना गैरहजर म्हणून नोंद करण्याची तयारी चालवून त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यांचीही तयारी चालवली होती.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा