नवी दिल्ली/लखनौ, दि. २७ - अयोध्येतील रामजन्मभूमीच्या मालकी हक्काबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाच्या प्रस्तावित निर्णयाला स्थगनादेश दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालय उद्या याप्रकरणी पुन्हा सुनावणी करणार आहे.
अखिल भारत हिंदू महासभा आणि सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड या खटल्यातील दोन्ही मुख्य पक्षकारांनी वादावर सामोमचाराने तोडगा निघण्याची शक्यता स्पष्टपणे फेटाळून लावली असून, लखनौ खंडपीठाचा निर्णय लवकरात लवकर घोषित करण्याची मागणी केली असल्याने उद्या होणाऱ्या या सुनावणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सरन्यायाधीश एस. एच. कपाडिया यांच्या नेतृत्त्वातील खंडपीठ उद्या सकाळी १०.३० वाजता या प्रकरणाची सुनावणी करणार आहे.
निकाल तीन महिने लांबणीवर टाका
दरम्यान, या खटल्यातील आणखी एक पक्षकार असणारा निर्मोही आखाडा लखनौ खंडपीठाचा निर्णय तीन महिन्यांसाठी पुढे ढकलावा अशी मागणी करणारे एक प्रतिज्ञापत्र उद्या न्यायालयात सादर करणार आहे, अशी माहिती आखाड्याचे वकील रणजीतलाल वर्मा यांनी दिली आहे.
या मुद्यावर चर्चेच्या माध्यमातून सामोपचाराने तोडगा निघावा यासाठी प्रयत्न करण्यासाठी ही मुदतवाढ देण्याची मागणी आम्ही न्यायालयाकडे करणार आहोत, असे वर्मा यांनी नवी दिल्लीकडे रवाना होण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या प्रकरणारची सुनावणी पूर्ण करून निर्णय तयार करणाऱ्या लखनौ खंडपीठाच्या तीन न्यायाधीशांपैकी न्या. धर्मवीर शर्मा हे या महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांनाही मुदतवाढ देण्याची मागणी निर्मोही आखाडा करणार आहे. अयोध्या येथील वादग्रस्त जमीनीच्या मालकीहक्काबाब सामोपचारानेच तोडगा काढावा अशी मागणी करणारी रमेशचंद्र त्रिपाठी यांनी दाखल केलेली याचिका दाखल करून घेत न्यायालयाने लखनौ खंडपीठाच्या निर्णयावर स्थगनादेश दिला होता.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा