Monday, 13 September 2010

झारखंडसंबंधी मतभेद नाहीत

गडकरींचे स्पष्टीकरण
नागपूर, दि. १२ : झारखंडमधील सत्ता स्थापनेवरून पक्षात कुठलेही मतभेद नसल्याचे आज (रविवार) भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. झारखंडचे मुख्यमंत्री अर्जुन मुंडा, झारखंड मुक्ती मोर्चाचे सर्वेसर्वा शिबू सोरेन यांचा मुलगा हेमंत आणि सुदेश महातो यांनी नागपुरात गडकरींची भेट घेतली. या वेळी गडकरी म्हणाले,"झारखंडमधील सत्ता स्थापनेवरून भाजपमधील काही वरिष्ठ नेते नाराज असल्याचे वृत्त काही वर्तमानपत्रांनी दिले आहे. ते सर्वथा चुकीचे आहे. भाजपच्या संसदीय समितीने प्रस्ताव दिल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हा निर्णय एकमताने झाल्याचे म्हणता येईल. २००३ मध्ये झारखंडमध्ये भाजपच्या सरकारचा शपथविधी झाला होता, तेव्हाही भाजपचे काही वरिष्ठ नेते उपस्थित नव्हते.'
मुंडा म्हणाले,"झारखंडमध्ये सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे. अशावेळी लोकांना पुन्हा निवडणुकांना सामोरे जायचे नाही. राज्याला स्थिर सरकारची गरज आहे. त्यामुळे आम्ही सरकार स्थापनेचा निर्णय घेतला.'

No comments:

Post a Comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा