आत्महत्या की अपघात याबाबत कमालीचे गूढ
कोची, दि. ७ - नौदलाच्या दक्षिण विभागाचे प्रमुख रिअर ऍडमिरल सत्येंद्रसिंग जामवाल (वय ५१) यांचा कोची येथील प्रशिक्षण केंद्रामध्ये गोळीबारात आज अपघाती मृत्यू झाला. देशभरात विलक्षण खळबळ माजवलेल्या या घटनेच्या चौकशीचे आदेश नौदलाने दिले आहेत.
कोची येथे उभारण्यात आलेल्या "आयएनएस द्रोणाचार्य' या छोटेखानी शस्त्र गोळीबार प्रशिक्षण रेंजमध्ये सकाळी साडेदहाच्या सुमारास गोळीबार सुरू असताना एस. एस. जामवाल यांना अपघाताने गोळी लागली व त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश नौदलाने दिल्याची माहिती नौदल प्रवक्त्याने नवी दिल्ली येथे दिली.
मात्र, ही घटना कशी घडली? जामवाल यांना अपघाताने गोळी कशी लागली? या प्रश्नांविषयी नौदलाने मौनच बाळगले आहे. जामवाल यांचे पार्थिव इस्पितळात हलविण्यात आले आहे. जामवाल यांनी आपल्या पिस्तुलमधून स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी प्रसारित केले होते; तथापि त्यास अधिकृत दुजोरा मिळाला नाही.
जामवाल यांची १जुलै १९८० रोजी भारतीय नौदलाच्या कार्यकारी शाखेत "सरफेस वॉरफेअर ऑफिसर' म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सनवार येथील लॉरेन्स स्कूल, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), तत्कालीन सोव्हिएट महासंघातील ग्रेचको नेव्हल वॉर कॉलेज, वेलिंग्टनमधील डीफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज आणि महू येथील आर्मी वॉर कॉलेजमधून त्यांनी शिक्षण घेतले होते. काही काळ ते गोव्यातील नौदल अकादमीतही उच्चाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूबद्दल विलक्षण गूढ निर्माण झाले आहे. मात्र चौकशी पूर्ण झाल्यानंतरच त्यातून नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या घडीला नौदलाने या विषयी अधिक तपशीलवार माहिती दिलेली नाही. फायरिंग रेंजच्या टप्प्यात येऊन एवढ्या उच्च पदावरील अधिकारी मृत्युमुखी पडल्याची घटना जवळपास घडतच नाही. म्हणूनच हे असे कशामुळे घडले, असा मूलभूत प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा