वाळपई, दि. ११ (प्रतिनिधी) - पिसुर्लेत काल रात्री काही घरांमध्ये शिरून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना लोकांच्या जागरूकतेमुळे पकडणे शक्य झाले तर, दोघे जण पळून जाण्यात यशस्वी ठरले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री दीडच्या सुमारास पाच चोर विजय परब यांच्या घरात खिडक्या तोडून आत शिरले. यावेळी आवाज झाल्याने घरातून परब बाहेर आले असता, चोरट्यांना चाहूल लागल्याने त्यांनी पळ काढला. परब यांनी यासंबंधी वाळपई पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली, पण काहीच मागमूस लागला नाही. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी पांडुरंग परब यांच्या घरात चोरीचा एक प्रयत्न केला. त्यावेळी जाग आलेल्या घरातील सर्वांनी गडबड केल्याने चोर पुन्हा एकदा निसटले. तथापि एकाच चप्पल मिळाल्याने गावातील लोकांनी चोरट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. गावातील एका खाण कंपनीत काम करणाऱ्या कामगारांची चौकशी केली असता, चपलेवरून एकाची ओळख पटली. जमावाने त्याला तेथे बदडून काढले. त्यावेळी अन्य दोघे पळाले पण तिघेजण हाती लागले. लोकांनी त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. पप्पू बनवासी, पिंटू बनवासी, रमेश बनवासी अशी त्यांची नावे आहेत. ते सर्व जण उत्तर प्रदेशातील आहेत. एकाच रात्री काही घरांमध्ये चोरण्याचा बेत होता, असे यावरून दिसून आले. पांडुरंग परब यांच्या घरातून चोरलेला मोबाईल फोन चोरांकडे सापडला. उपनिरीक्षक चंद्रकांत नाईक, हवालदार उदय उमर्ये, रमेश कापार्डेकर पुढील तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा