जामीन अर्जावरील युक्तिवाद पूर्ण
नादियाच्या घरी त्या दिवशी मिकीला आणखी कोणाची साथ होती : अभियोगपक्ष
मडगाव, दि. ६ (प्रतिनिधी): नादिया तोरादो मृत्युप्रकरणी मुख्य संशयित असलेले माजी मंत्री मिकी पाशेको यांच्यावतीने सादर केलेल्या जामीन अर्जावरील युक्तिवाद आज येथील अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायालयात पूर्ण झाले. उद्या सकाळी १० वा. याप्रकरणी निवाडा देण्याचा संकेत न्या. प्रमोद कामत यांनी त्यानंतर दिला. त्यामुळे माजी मंत्र्यांना आणखी एका दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.
आत्तापर्यंत पुढे आलेल्या माहितीवरून आरोपीविरुद्ध प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध झालेले असून त्यात त्यांच्यासोबत आणखी कोण कोण आहेत ते उघड करण्यासाठी त्यांची कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे, आज सरकारच्या बाजूने युक्तिवाद करताना सरकारी वकील सरोजिनी सार्दिन यांनी प्रतिपादिले. आरोपीने कनिष्ठ न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत अटक चुकविण्यासाठी केलेली धडपड वाया गेली व या सर्व न्यायालयांनाही त्यांची कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे पटले हाच निष्कर्ष निघतो असे त्यांनी सांगितले. या प्रकरणाच्या गुणवत्तेचा प्रश्न प्रारंभिक टप्प्यात उपस्थित करण्याचे कारण नाही, गुणवत्ता काय आहे ते अंतिम टप्प्यात कळून येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आरोपीवरील आरोपांत भरपूर प्रमाणात प्रथमदर्शनी तथ्य आहे व त्यासाठी कोठडीतील चौकशीसाठी त्यांचा जामीन अर्ज फेटाळला जावा, अशी विनंती त्यांनी केली. ती फेटाळली गेली नाही व अर्ज मंजूर केला तर तमाम न्यायालयीन निवाड्याचा तो पराभव ठरू शकतो याकडे त्यांनी लक्ष वेधले.
त्यांनी गुन्हा अन्वेषण विभागाने आरोपीस चौकशीसाठी पाचारण केले त्या वेळेचे उदाहरण दिले व तो निरपराध होता तर बेपत्ता का झाला; सर्व न्यायालयांत निराशा पदरी पडल्यानंतर शरण येणे ही गंभीर बाब आहे व त्या सर्वांमागे त्याचा हेतू शुद्ध नव्हता हे स्पष्ट होते असे सांगितले. तपास अधिकाऱ्यांकडे उपलब्ध असलेले पुरावे या टप्प्यात सादर करण्याची मुळीच गरज नाही, असे सांगून मिकींच्या व्हियोला या दुसऱ्या बायकोबाबतच्या जाहिरातीमुळे नादिया खचण्याचा प्रश्र्नच उद्भवत नाही. कारण सारा वेगळी राहायला गेल्यापासून ती त्यांच्या घरात राहत होती व तिला मुलेही झालेली असल्याने या तर्काला अर्थ राहत नाही, हे दाखवून दिले. मिकी व नादियामध्ये गहिरे संबंध होते, उभयता एकत्र देशविदेशांत फिरत होती हे वेळोवेळी दिसून आलेले आहे, असेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
ज्या दिवशी नादियाने रेटॉल घेतले त्याच्या आदल्या रात्री मिकी त्यांच्या घरी होते. त्यावेळी तेथे आणखी कोण कोण होते ते त्यांच्याकडूनच वदवून घ्यायला हवे. नंतर दुसऱ्या दिवशी अपोलो व्हिक्टर ते ज्युपिटर व नंतर चेन्नई हॉस्पितळापर्यंत ते सोबत होते, मुंबईत तिच्या घेतल्या गेलेल्या कथित मृत्युपूर्व जबानीवेळी त्या परिसरात ते होते, रेटॉलबाबत नादिया व तिच्या आईने दिलेल्या जबानीत मोठा फरक आहे, रेटॉलचा रिकामा ट्यूब कुठे गेला, नादियाच्या मृत्यूनंतर तिच्या पलंगावरील चादरी, उश्या व अन्य कपडे तात्काळ का नष्ट केले गेले, याचा संपूर्ण तपास आवश्यक असून त्यासाठी कोठडीतील चौकशी आवश्यक आहे, असे त्यांनी प्रतिपादिले. नादियाचा संपूर्ण शवचिकित्सा अहवाल उपलब्ध झालेला असून त्याने या संपूर्ण प्रकरणावर प्रकाशझोत पडत आहे. त्यानुसार तिच्या शरीरावरील जखमा या नंतर उमटलेल्या आहेत, यकृत निकामी होऊन मृत्यू आला तर अगोदरच्या माराच्या खुणा नंतर उमटतात असे त्यांनी सांगितले.
बिगर सरकारी संघटनांकडून तपास संस्थेकडे तक्रारी आलेल्या नाहीत म्हणून त्या तक्रारीनंतर खुनाचा गुन्हा नोंदविण्याचा प्रश्र्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी, आपला कालचा युक्तिवाद पुढे सुरू करताना अर्जदाराचे वकील ऍड. सुरेंद्र देसाई यांनी अनेक निवाड्यांचे दाखले देत हे प्रकरण कसे जामिनासाठी योग्य आहे ते न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. या अर्जावर निर्णय देताना उच्च वा सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा प्रभाव येऊ देऊ नका अशी विनंती केली गेली. आपल्या अशिलाचा या एकंदर प्रकरणाशी कोणताच संबंध नाही असे सांगून हा निव्वळ आत्महत्येचा प्रकार असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. चेन्नई येथे नादियाला मृत्यू आल्यानंतर तिचा मृतदेह गोव्यात आणून त्याचे दफन झाल्यावर तिच्या शरीरावर उमटलेल्या जखमांच्या खुणा या पंधरा दिवसांपूर्वीच्या जखमांच्या आहेत असे कोणत्या आधारावर सांगू शकतात असा सवाल त्यांनी केला. अपोलो व्हिक्टर व ज्युपिटर तसेच चेन्नई इस्पितळात दाखल करतेवेळी तिच्या शरीरावर नसलेल्या खुणा मृत्यूनंतर कशा उमटल्या, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. आपल्या अशिलाने आजवर तपासात सहकार्य केलेले आहे, मयताची आई, भाऊ व खुद्द पती तिने आत्महत्या केल्याचे सांगत आहेत व गुन्हा अन्वेषणाने तर त्यांची तब्बल नऊ तास चौकशी केलेली असताना आता आणखी चौकशी बाकी आहे अशी विचारणा करून त्यांना त्यांचा सुतरामही संबंध नसलेल्या प्रकरणात अडकावण्याचा हा डाव असल्याचे सांगितले व जामीनअर्ज मंजूर करण्याची विनंती केली.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा