सीमाभागात अटकसत्र
मुंबई, दि. १३ : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत बेळगाव, निपाणी, कारवार, भालकी आणि बिदर हा परिसर केंद्रशासित करावा, या मागणीचा पुनरुच्चार शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव यांनी आज येथे केला. बेळगावमध्ये मराठी भाषिकांवर झालेल्या लाठीमाराचा त्यांनी या वेळी कडक शब्दात निषेध केला.
या प्रदेशात केंद्रीय सुरक्षा दल नियुक्त करावे, अशी मागणी करून ते म्हणाले, की सीमाप्रश्न सोडविण्यासाठी हालचाल करण्यासाठी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने बराच वेळ घेतला. त्यामुळे हा प्रश्न अद्याप सुटू शकला नाही. बेळगाव आणि भोवतालच्या मराठी भाषिक प्रदेश राज्यात यायलाच हवा.
बेळगावमधील मराठी भाषकांच्या विराट मोर्चाची धडकी भरल्याने कर्नाटक पोलिसांची तारांबळ उडाली आहे. बेछूट लाठीमार करून, मोर्चाला बिथवरण्याची कृती करूनही मराठी भाषकांची एकजूट कायम राहिली आहे. त्यामुळे आता पोलिसच बिथरले आहेत आणि पद्धतशीरपणे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती आणि या मोर्चात पुढाकार घेणाऱ्यांचे अटकसत्र आज सुरू झाले आहे.
सायंकाळी उशिरा खानापूरचे माजी आमदार आणि सीमालढ्यातील सक्रिय कार्यकर्ते मनोहर किणेकर यांच्या अटकेसाठी कर्नाटक पोलिस त्यांच्या निवासस्थानी पोचल्याचे समजते. पोलिसांच्या या अटक सत्राच्या यादीत किणेकर यांच्यासह माजी महापौर शिवाजी सूंडकर, माजी महापौर विजय मोरे, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आणि माजी आमदार वसंतराव पाटील, माजी आमदार दिगंबर पाटील यांचा समावेश असणाऱ्याची शक्यता आहे. या अटक सत्रामुळे बेळगावमधील मराठी बांधवात पुन्हा एकदा संतापाची लाट पसरली आहे.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा