पंतप्रधानांचा राजीनाम्यास नकार
काठमांडू, दि. ३ - पंतप्रधान माधवकुमार नेपाळ यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज सकाळपासूनच माओवाद्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. पण, यानंतरही पंतप्रधानांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याने देशात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
माधवकुमार नेपाळ यांचे सरकार शांतता प्रक्रियेबाबत अजिबात गंभीर नाही, तसेच राज्यघटना तयार करण्याबाबतही ते उदासीन आहे, अशी टीका माओवाद्यांचे नेते प्रचंड यांनी केली आहे. त्यांच्यावर दबाव आणण्यासाठीच हे आंदोलन पुकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय एकतेचा पुरस्कार करणारे सरकार देशवासीयांना हवे आहे. सध्याच्या सरकारला जनतेचे समर्थन नाही, असा दावाही त्यांनी केला.
पण, आपल्यावरील सर्व आरोप खोडून काढत नेपाळ यांनी पंतप्रधान पद सोडण्यास स्पष्ट नकार दिला आहे. सरकार पाडण्यासाठी विरोधकांचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, संप, आंदोलन यांनी समस्या सुटत नसतात. माओवाद्यांनी आपले आंदोलन मागे घेतले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
आजच्या या संपामुळे नेपाळमधील जनजीवन मात्र विस्कळीत झाले होते.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा