वीजमंत्र्यांनी दिलेली माहिती
पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): वीज खात्याच्या ताब्यात असलेल्या भूखंडांचे सर्वेक्षण करून त्याचे व्यवस्थित दस्तऐवजीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय वीजमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी घेतला आहे. सरकारी छापखान्याचे संचालक एन. डी. अगरवाल यांची याकामी प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली असून येत्या सहा महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.
मंत्री सिक्वेरा यांनी ही माहिती दिली. वीज खात्याची राज्यात विविध ठिकाणी जमीन असून तिची योग्य निगा राखणे व त्या जागेवरील अतिक्रमणे टाळण्यासाठी ही योजना आखण्यात आल्याचे ते म्हणाले. सध्या सरकारी जमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याची उदाहरणे असून त्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल टाकण्यात येत आहे. वीज खात्याच्या विभाग - १५ व्दारे या कामावर देखरेख ठेवण्यात येणार आहे. वीज खात्याच्या ताब्यात असलेल्या जमिनीबाबतच्या दस्तऐवजांचे संग्रहीकरण करण्यात येणार आहे. मुळात या जागांचे सर्वेक्षण करून त्याला योग्य पद्धतीने कुंपण घालून त्या जागेचे संरक्षण करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. काही ठिकाणी जागा प्रत्यक्ष वीज खात्याच्या ताब्यात असली तरी प्रत्यक्षात खात्याचे नाव एक चौदाच्या उताऱ्यावर आलेले नाही. काही ठिकाणी जागेचे म्युटेशन झाले नसल्याने अतिक्रमण केलेल्यांना बाहेर काढताना त्याचे कायदेशीर परिणाम खात्याला भोगावे लागतील, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
खात्याकडे असलेल्या सर्व भूखंडांचे योग्य पद्धतीने दस्तऐवजीकरण ही जागा अतिक्रमणांपासून सुरक्षित ठेवण्यासाठीच हा खटाटोप सुरू असल्याचेही सिक्वेरा यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा