पणजी, दि. ९ (प्रतिनिधी) - बॉम्ब स्फोट प्रकरणानंतर सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणारा कोणताही प्रस्ताव अद्याप राज्य गृहखात्याकडून आपल्यापर्यंत आला नसल्याची माहिती आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दिली. गृहखाते सांभाळणाऱ्या मंत्र्यांनी आपल्यापर्यंत असा कोणताच प्रस्ताव पाठवला नसल्याने आपण त्यावर बोलणे योग्य होणार नसल्याचे श्री. कामत म्हणाले. कोणत्याही संस्थेवर बंदी घालण्यापूर्वी गृहखात्याने प्रस्ताव पाठवण्याची गरज असते, असे श्री. कामत म्हणाले.
मडगाव येथे दिवाळीच्या आदल्या रात्री बॉम्ब स्फोट झाल्यानंतर यात सनातन संस्थेचा हात असल्याच दावा करून कॉंग्रेस सरकारमधील काही मंत्र्यांनी आणि नेत्यांनी या संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली होती. यावेळी चक्क गृहमंत्र्यांनी घटनेच्याच दिवशी या संस्थेवर आरोप करून या स्फोटामागे या संस्थेचा हात असल्याचे वक्तव्य केले होते.
नंतर गोवा पोलिसांनी नागेशी येथील सनातन संस्थेच्या आश्रमावर छापा टाकून अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तसेच, संगणकही ताब्यात घेतले होते. यानंतर हे प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे सोपवण्यात आले होते. यावेळी तपास यंत्रणेने सनातन संस्थेचे साधक असल्याचा दावा करून चौघा जणांना ताब्यात घेतले होते.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा