नुकसानभरपाईच्या विषयावरून शेतकरी आक्रमक
पेडणे, दि. २० (प्रतिनिधी): मोपा येथील नियोजित विमानतळ आज होणार, उद्या होणार असे सांगून आमच्या जमिनी १० वर्षांपूर्वी सरकारने ताब्यात घेतल्या, यामुळे माळरानावर शेतीव्यवसाय करता आला नाही. शेतीव्यवसायापासून परावृत्त केल्याने सरकारने आता १० वर्षांसाठीची नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी मोपा येथील शेतकऱ्यांनी केली.
नियोजित मोप विमानतळासाठी ज्या जमीन मालकांच्या जमिनी सरकार घेणार आहे त्यांना अगोदर निश्चित दर द्यावा तसेच १० वर्षांची नुकसानी द्यावी, अन्यथा जमिनी देण्यास तीव्र विरोध केला जाईल, असा इशारा मोपाचे सरपंच प्रमोद परब यांच्यासह जमीन मालकांनी दिला. यात जयप्रकाश परब, विष्णू नाईक गावकर, नारायण दत्ताराम परब, हरी राऊळ, गणपत मोपकर, गजानन नाईक, नंदकिशोर नाईक, उत्तम राऊत, दयानंद परब, वसंत मोपकर, आनंद मोपकर, सीताबाई रामा मोपकर, विलास पालव, अनिता नागेश राऊळ, भाग्यश्री राऊळ, सखाराम गावकर, रामा राऊळ, गंगाराम राऊळ, महादेव परब, राजन पेडणेकर, महादेव राऊळ व नकुल राऊळ या जमीनमालकांचा समावेश होता.
मोप विमानतळ विशेष भूसंपादन अधिकारी एम. के. वस्त यांनी आज (२० रोजी) मोप येथील श्री वेताळ मंदिरात शेतकऱ्यांची व इतर संबंधित जमीनमालकांची बैठक आयोजित केली होती. यावेळी श्री. वस्त यांनी विमानतळासाठी ज्यांच्या जमिनी संपादित केल्या जाणार आहेत त्यातील काही सर्व्हेमध्ये १० पेक्षा जास्त भाटकार व कूळ आहेत, असे सांगितले. यातील प्रत्येकाचा हिस्सा किती आहे याची माहिती देण्याची मागणी त्यांनी केली असता शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
शेतकरी, जमीनमालकांच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय आणि जमिनीला योग्य दर मिळाल्याशिवाय जमिनी देणार नाही, अशा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी श्री. वस्त यांनी सदर मागण्या विमानतळ प्राधिकरणाच्या बैठकीवेळी मांडण्याचे आश्वासन दिले.
मोप विमानतळाला स्थानिकांचा वाढता विरोध लक्षात घेऊन सरकारने जमीनमालकांच्या मागण्या पूर्ण कराव्या व त्यांना योग्य किंमत द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच पालकमंत्री बाबू आजगावकर यांच्यासोबत एक बैठक आयोजित करून त्यांच्यापुढे मागण्या मांडण्याचे निश्चित करण्यात आले. पालकमंत्र्यांनी मागण्या मान्य न केल्यास विमानतळाला विरोध करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
वारंवार नोटिसा पाठवून शेतकऱ्यांना त्रास देण्यापलीकडे सरकारने काहीही केलेले नाही. सरकार विमानतळ उभारणार की निव्वळ थापा मारणार? मागण्या मान्य होत नाही तर विमानतळ नकोच असा इशारा सरपंच प्रमोद नाईक यांनी दिला.
मोप विमानतळासाठी एकूण ८९ लाख चौ.मी. जागा संपादित केली जाणार आहे. या विमानतळासाठी सर्वप्रथम मोपावासीयांनीच हिरवा कंदील दाखवला होता, पण शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर याबाबत फेरविचार करावा लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा