नवी दिल्ली, दि. १८ ः उत्तर पश्चिमेसह देशातील अनेक भागांत सुरू असलेला उष्णतेचा तडाखा आणखी काही काळ सहन करावा लागणार असल्याचे भाकित हवामान खात्याने वर्तविले आहे.
भारतीय हवामान खात्याचे संचालक अजित त्यागी यांनी सांगितले की, सध्या देशात बऱ्याच ठिकाणी उन्हाचा विक्रमी तडाखा सुरू आहे. आगामी काही दिवसांत ही परिस्थिती बदलण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. वातावरणातील हा उष्मा आणखी काही महिने कायम राहण्याची शक्यता आहे. दिवस आणि रात्रीचे तापमान सातत्याने वाढत आहे. मध्य भारतात सध्या वाहत असलेले गरम वारे यंदा मान्सून चांगला राहण्याचे संकेत देत आहेत.
मार्च आणि एप्रिल महिन्यात गारा किंवा पाऊस पडलेला नाही. याचाच अर्थ, गव्हाच्या पिकाला कोणतेही नुकसान झालेले नाही. बरेचदा मार्चमध्ये होणाऱ्या गारपिटीने गव्हाचे नुकसान होते. सध्याचा वाढता उष्मा पाणी आणि वीज या व्यवस्थांवर भार टाकणारा असला तरी तो मान्सूनच्या दृष्टीने फायद्याचा आहे. एप्रिलमध्ये इतकी गरमी असणे याचाच अर्थ यापुढील दीड ते दोन महिनेही उन्हाचे चटके कायम राहणार आहेत. मे महिन्यात तापमानात आणखी वाढ संभवते, असेही त्यागी यांनी सांगितले.
जर मान्सूनवर याचा चांगला परिणाम होणार असेल तर शेतकऱ्यांसाठी ते शुभवर्तनामच म्हटले पाहिजे. कारण, जर पाऊस चांगला झाला तर मुबलक अन्नधान्याचे उत्पादन होऊन सध्याची महागाई कमी होऊ शकेल, अशी आशा बाळगता येईल. मात्र, एकीकडे अन्नधान्याची कोठारे भरून चालली असली तरी या देशातील ४० कोटींहून अधिक लोक आजही अर्धपोटी राहात असल्याचे वास्तव कायम उरतेच. असे असले तरी चांगला पाऊस होणार ही गोष्ट या उष्मादायी वातावरणातही सुखदच म्हटली पाहिजे!
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा