'मिग'विमानाच्या कवायतीचा परिणाम
हरमल, पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): काणकोण भागातील किनारी पट्ट्यात गेल्या १० रोजी भयाण व कानठळ्या बसवणाऱ्या स्फोटसदृश आवाजामुळे निर्माण झालेल्या भीतीग्रस्त वातावरणाचे पडसाद अजूनही दूर झाले नसताना आज पेडणे तालुक्यातील मांद्रे, मोरजी व हरमल भागातही हाच प्रकार घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. या भयानक आवाजाची तीव्रता इतकी भयंकर होती की त्यामुळे किनारी भागात राहणाऱ्या लोकांच्या घरातील वस्तूही खाली पडल्या. या घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटल्यानंतर याविषयावर बेफिकीर असलेल्या राज्य सरकारलाही या घटनेचा शोध घेणे भाग पडले. अखेर चौकशीअंती हा प्रकार नौदलात दाखल झालेल्या मिग लढाऊ विमानांच्या प्रात्यक्षिकाचा परिणाम होता हे उघड झाले व त्यानंतरच लोकांचा जीव भांड्यात पडला.
हरमल समुद्रात आज दुपारी सुमारे १२.३० वाजता अचानक कानठळ्या बसवणारा भयानक आवाज निर्माण झाला. या आवाजाची तीव्रता इतकी भयंकर होती की त्यामुळे एकवेळ संपूर्ण पेडणे तालुक्यातच धरणीकंप झाला की काय,अशी भीती पसरली. वाघ कोळंब भागातील किनाऱ्यावर साधारणतः ३०० मीटर अंतरावर एक जहाज बराच वेळ उभे होते. हा आवाज झाल्यानंतर अचानक हे जहाज वेगाने जाताना दिसले व त्यामुळे स्थानिकांच्या मनात एकच धडकी भरली. हा आवाज मोरजी,मांद्रे, चोपडे, केरी, तेरेखोल व कोरगावपर्यंतच्या लोकांना ऐकू आला,अशीही खबर प्राप्त झाली आहे. केरी तेरेखोलच्या पल्याड महाराष्ट्राच्या सीमाभागात रेडी उषा इस्पात कंपनी आहे. कदाचित तिथे मोठा स्फोट झाला असावा,असा अंदाज लोकांनी लावला. या घटनेची वार्ता सुसाट वाऱ्यासारखी तालुकाभर पसरल्यानंतर अनेकांनी कोळंब किनाऱ्यावर गर्दी केल्याचीही माहिती देण्यात आली. कोळंब किनाऱ्यावर समुद्रात उभ्या असलेल्या जहाजाचाच या स्फोटाच्या आवाजाशी संबंध लावण्यात आल्याने त्यामुळे चर्चेला उधाण आले होते.हा आवाज झाल्यानंतर काही क्षणापूर्ती नेमके काय घडले याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता व त्यामुळे बराच गोंधळ निर्माण झाला,अशी माहिती स्थानिक व्यावसायिक सुरेश बर्डे यांनी दिली. या आवाजामुळे धरणीकंप झाल्याचा आभास निर्माण झाला व त्यामुळे भूकंप झाल्याचाही अंदाज काही लोकांनी काढल्याचे प्रवीण वायंगणकर या युवकाने सांगितले. समुद्रात स्फोट झाला असे वाटत असले तरी पाण्याच्या प्रवाहात किंवा पातळीवर काहीही परिणाम जाणवत नव्हता, त्यामुळे हा आवाज नेमका कशाचा हेच कळेनासे झाले,असे संजय मयेकर यांनी सांगितले. बाकी आज दिवसभर हीच चर्चा तालुक्यात सुरू होती.
मीग लढाऊ विमानाच्या कवायती
काणकोण भागातील समुद्रकिनाऱ्यावर व आज बार्देश तथा पेडणे तालुक्यातील किनारपट्टी भागात लोकांनी अनुभवलेला स्फोटांचा आवाज हा नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या नव्या मीग लढाऊ विमानांच्या सरावावेळी निर्माण झालेला आवाज होता,असे स्पष्टीकरण नौदलाने राज्य सरकारकडे केल्याची माहिती मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दिली आहे.१० रोजी काणकोण येथे तीन वेळा मोठ्ठा आवाज झाल्याने लोकांत भीतीचे वातावरण पसरले होते. हा आवाज नेमका कशाचा होता, याबाबत कुणालाच काहीच माहिती मिळाली नाहीच व सरकारकडूनही अधिकृत काहीही माहिती देण्यात आली नसल्याने ते गुपितच राहिले होते.आज बार्देश तालुक्यातील हणजूण व पेडणेतील मोरजी,मांद्रे व हरमल भागात अशाच प्रकारचा स्फोटांचा आवाज झाल्याने लोकांत अधिकच भिती पसरली होती. मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांनी यासंबंधी नौदलाकडे विचारणा केली असता त्यांनी हा आवाज मीग लढाऊ विमानांचा असल्याचे स्पष्ट केले आहे,असे सरकारने कळवले आहे.
शांतारान नाईकांचा निषेध
नौदलाकडून झालेल्या बेफिकीर वृत्तीचा राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांनी कडक शब्दांत निषेध केला. काणकोण येथील घटनेला पाच दिवस पूर्ण होऊनही व या वृत्ताबाबत सर्वत्र खळबळ उडूनही नौदलाने पाळलेले मौन ही राज्य प्रशासनाची थट्टा करण्याचाच प्रकार आहे व त्याबाबत आपण केंद्रीय सुरक्षा मंत्रालयाकडे निषेध नोंदवणार असल्याचे ते म्हणाले.
अशा प्रयोगांवेळी जनतेला अवगत करणे गरजेचे आहे, अन्यथा या घटनेतून लोकांत गैरसमज व भीती पसरल्यास त्याचे परिणाम भयानक होऊ शकतात,असेही श्री.नाईक म्हणाले. नौदलाने अशा प्रकारचे प्रयोग हे खोल समुद्रात करावेत जेणेकरून राज्यातील किनारी भागातील लोकांना त्याचा त्रास होणार नाही,अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा