इंदूर, दि. १६ : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उद्यापासून सुरुवात होत आहे. या बैठकीसाठी देशभराीतल पक्षाचे नेते येत आहेत. सलग दोन लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि नितीन गडकरी यांच्या रूपाने पक्षाला मिळालेले एक तरुण व धडाडीचे नेतृत्व या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे डोळे लागलेले आहे.
राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उद्यापासून प्रारंभ होईल, तर राष्ट्रीय परिषदेची बैठक १८ आणि १९ फेब्रुवारीला होईल. या बैठकीत नितीन गडकरी यांच्या पक्षाध्यक्षपदी झालेल्या निवडीला मंजुरी देण्याची औपचारिकता पूर्ण केली जाणार असून भाजपाला एक सशक्त व प्रभावी संघटना बनविण्यासाठी व रालोआला अधिक बळकट करण्यासाठी पक्षाचे धोरण कसे असायला पाहिजे, यावर विचारमंथन करण्याची संधी नेत्यांना या बैठकीत दिल्या जाण्याची शक्यता आहे.
मे २००९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला होता. या पराभवानंतर पक्ष नेतृवात बदल करून नितीन गडकरी या विकासाने झपाटलेल्या नेत्याकडे पक्षाध्यक्षपदाची सूत्रे देण्यात आली. सुषमा स्वराज यांची लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी, तर अरुण जेटली यांची राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड करून पक्षाला एक तरुण चेहरा देण्यात आला होता. या घडामोडींनंतर होणारी राष्ट्रीय परिषदेची ही पहिलीच बैठक आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत महागाई, अंतर्गत सुरक्षा, दहशतवादी हल्ले यासारख्या मोठ्या समस्यांवरही चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा