पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): कळंगुट येथे कामगाराचा दगडाने ठेचून खून केल्याप्रकरणी आरोपी रघू ब्रजेंद्र नारायण सरंगल (४६) याला आज जलद गती न्यायालयाच्या न्यायाधीश विजया पळ यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दि. १४ मार्च २००८ साली रेहमान नामक व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. या प्रकरणाचे तपास अधिकारी तथा तत्कालीन कळंगुट पोलिस स्थानकाचे निरीक्षक तुषार वेर्णेकर व उपनिरीक्षक राहुल परब यांनी गुन्हा सिद्ध होण्यासाठी सर्व पुरावे न्यायालयात सादर केल्याने आरोपी रघू याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. ज्या दिवशी खून झाला त्याच्या काही तासांपूर्वी रेहमानला रघूबरोबर जाताना एका बारमालकाने पाहिले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्याच बारच्या मागील बाजूस रेहमान याचा मृतदेह आढळून आला होता. यावेळी रघू याच्या शोध घेतला असता तोही बेपत्ता असल्याने त्याच्यावर संशय बळावला होता. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी रघू याला कळंगुट पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांनी हा खून आपण केल्याचे मान्य केले होते. तसेच खून करण्यासाठी वापरण्यात आलेला दगडही पोलिसांच्या ताब्यात दिला होता.
घटनेच्या रात्री रघू, रेहमान व मणी नामक व्यक्ती कळंगुट येथील डिकुन्हा बारमध्ये दारू पिण्यासाठी बसले होते. काही तासांनी तिघेही झोपण्यासाठी निघून गेले. काही वेळात मणीने धावत येऊन रेहमान आणि रघू भांडत असल्याची माहिती बारमालकाला दिली होती. यावेळी त्यांनी त्याठिकाणी धाव घेतली असता रेहमान हा पाण्याच्या टॅंकमध्ये पडल्याचे आढळून आले तर त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होते. यावेळी त्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचाराला कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने त्याच्या मृत्यू झाला होता.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा