निवृत्त अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा
नवी दिल्ली, दि. ११ : रामायलयम या बिगर-राजकीय ट्रस्टच्या माध्यमातून अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव हे कमालीचे आग्रही होते; मात्र निवडणुकीत हार स्वीकारावी लागल्यानंतर त्यांना हा प्रयत्न सोडून द्यावा लागला, असा दावा त्यांच्या काळातील एका सहसचिवाने आपल्या पुस्तकात केला आहे.
पी. व्ही. आर. के. प्रसाद असे या आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे. प्रसाद हे तेव्हा पंतप्रधानांच्या कार्यालयात कार्यरत होते. "प्रत्यक्षात काय घडले', असे त्यांच्या मूळ तेलगू पुस्तकाचे नाव असून त्याची इंग्रजी आवृत्ती येऊ घातली आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशीद संघ परिवाराकडून पाडण्यात आली. तथापि, काहीही झाले तरी याचे श्रेय संघ परिवाराला मिळू नये, असे राव यांना मनोमन वाटत होते. त्यामुळेच त्यांनी मशीद पाडली गेल्यानंतर दोन वर्षांनी तेथे मंदिर उभारणीसाठी जोरदार प्रयत्न आरंभले होते. प्रत्यक्षात, त्यानंतरच्या निवडणुकीत कॉंग्रेसचा जनाधार घटला आणि राव यांचे स्वप्न हवेतच विरले. अर्थात, हे करताना याकामी कॉंग्रेस व स्वतः त्यापासून कसे दूर राखले जातील याचीही पुरेपूर दक्षता राव यांनी घेतली होती, असा दावा प्रसाद यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.
राममंदिर ही फक्त भाजपचीच मक्तेदारी नाही. आम्ही कॉंग्रेसजनसुद्धा रामभक्त आहोत. मात्र आम्ही टोकाचे दुराग्रही वा नास्तिक नाही. आम्हीच अयोध्येत मंदिर उभारायला हवे. तथापि, भाजप व संघ परिवाराकडून असा प्रचार केला जात आहे की, कॉंग्रेसकडूनच याकामी अडथळे आणले जात आहेत, अशी व्यथा राव यांनी बोलून दाखवल्याचा दावादेखील या पुस्तकात करण्यात आला आहे. शक्यतो बिगर राजकीय ट्रस्टकडूनच मंदिराची उभारणी करण्याबाबत राव प्रयत्नशील होते. त्यामुळे कोणताच राजकीय पक्ष यात गुंतलेला नसेल असे संकेत जनतेपर्यंत जातील, अशी राव यांची व्यूहरचना होती. त्यांनी सदर ट्रस्टची नोंदणी करण्याचेही प्रयत्न सुरू केले होते. या ट्रस्टमध्ये राव यांनी संघ परिवाराशी जवळीक साधून असलेले उडपी पेजावर मठाचे स्वामी रामानंद तीर्थ यांनाही सामील करून घेण्याची धडपड आरंभली होती. एवढेच नव्हे तर बिहारमधील एक आयपीएस पोलिस अधिकारी किशोर कुणाल यांना राव यांनी पाचारण केले होते. धार्मिक नेत्यांना एकत्र करण्याची जबाबदारी पार पाडण्याचे काम प्रसाद यांच्यावर सोपवण्यात आले होते आणि त्यांना याकामी सहकार्य करण्याची सूचना राव यांनी केली होती. तसेच गरज पडल्यास यासंदर्भात कुप्रसिद्ध तांत्रिक चंद्रास्वामी याचीही मदत घेण्याची सूचना राव यांनी तेव्हा केली होती, असा दावा प्रसाद यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. त्यामुळे जेव्हा या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद बाजारात उपलब्ध होईल तेव्हा त्यावरून छोटे-मोठे राजकीय स्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा