गोवा पोलिसांची खंडपीठात माहिती
पणजी, दि. १९ (प्रतिनिधी): शिरसई कोमुनिदादमध्ये झालेल्या गैरप्रकारावरून आग्नेल डिसोझा, निशीकेत परब आणि पांडुरंग परब या तिघांविरुद्ध पुन्हा गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली जाणार आहे. तसेच, त्यांची मालमत्ता जप्त करून त्यांची बॅंक खातीही गोठवली जाणार असल्याची माहिती आज गोवा पोलिसांनी प्रतिज्ञापत्रासह मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला दिली. मात्र, या पुढे या तपासात पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्यास हे प्रकरण केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवले जाईल, अशी थेट तंबीही आज गोवा खंडपीठाने दिली. यापूर्वी या तिन्ही व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंद करून घेताना आणि तपासात हलगर्जीपणा केल्याने या प्रकरणाचे म्हापसा पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक उदय गावडे यांच्याविरुद्ध खात्याअंतर्गत कारवाईही केली असल्याची माहिती उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी खंडपीठाला दिली. त्यामुळे या पुढील तपास म्हापसा उपविभागीय पोलिस उपअधीक्षक सेमी तावारीस करणार असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला कळवले आहे. यावेळी तिन्ही पोलिस अधिकारी न्यायालयात प्रत्यक्ष हजर होते.
शिरसई कोमुनिदादमध्ये केलेल्या आर्थिक घोटाळ्यातील संशयितांची योग्य पद्धतीने चौकशी करण्यात आलेली नाही. तसेच, त्याची बॅंक खातीही गोठवण्यात आलेली नाही. तक्रार करताना त्यांना लावण्यात येणारे कलम नमूद केले होते, ते पोलिसांनी लावले नाही. त्यामुळे त्यांना जामीन प्राप्त झाला. तसेच पोलिसांनी त्यांच्या जामीन अर्जालाही विरोध केला नाही, अशी माहिती याचिकादाराने खंडपीठाला दिली होती. त्याची दखल घेऊन न्यायालयाने पोलिस खात्याकडून या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल मागितला होता. या अहवालात पोलिसांनी आता तक्रार दाराने दिलेले कलम लावले जाणार असल्याची माहिती दिली आहे.
वरील तिघा व्यक्तींनी सुमारे ५१४ कोमुनिदादचे भूखंड विकले अजून करोडो रुपयांचा घोटाळा केला असल्याचे आरोप करून याचिका दाखल करण्यात आली होती. या ५१४ भूखंडांपैकी कोमुनिदादच्या कार्यालयात केवळ १५ भूखंडाची माहिती उपलब्ध आहे. तर, ८ जणांनी आपले भूखंड नावावर करण्यासाठी अर्ज केले आहेत, अशी माहिती याचिकादाराने खंडपीठाला दिली.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा