पणजी, दि.२९ (प्रतिनिधी) - राजकीय संघर्षाला कधीच वैयक्तिक विद्वेषाची झालर असता कामा नये.राजकारण आणि समाजकारण या दोन्हींचा एकमेकांशी अतूट असा संबंध आहे. जनताजनार्दनामुळेच आपण राजकारणात महत्त्वाची पदे भूषवीत असतो, याचा विसरही कधी पडू देता कामा नये. शशिकलाताई काकोडकर यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत सामान्यांशी असलेली नाळ कायम ठेवली व त्यामुळेच सामाजिक व राजकीय इतिहासात त्यांचे नाव कायम आहे, त्यांची लोकप्रियता आजही टिकून आहे, असे उद्गार केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी काढले.
श्रीमती शशिकलाताई काकोडकर यांच्या अमृत महोत्सव सत्कार सोहळ्यानिमित्त कांपाल येथील स्व.भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर आयोजित केलेल्या भव्य सोहळ्याला संबोधित करताना ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री दिगंबर कामत, उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक,राज्यसभा खासदार शांताराम नाईक,सत्कार समितीचे अध्यक्ष तथा वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर,महसूलमंत्री जुझे फिलीप डिसोझा,गोमंतक मराठा समाजाचे अध्यक्ष ऍड.महेश आमोणकर व माजी उपसभापती शंभू भाऊ बांदेकर उपस्थित होते.अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित केलेल्या या सोहळ्यात शरद पवार यांच्याहस्ते शशिकलाताई काकोडकर यांचा हद्य सत्कार करण्यात आला.शाल,श्रीफळ,मानपत्र व श्री देवी महालसाची सुंदर व सुबक चांदीची मूर्ती प्रदान करून त्यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी पारंपरिक गोमंतकीय दिवजांचे सुवासिनींकडून प्रज्वलन झाल्यानंतर खास ताईंकडूनही दिवजांप्रज्वलन झाले व त्याला दारूकामाच्या आतषबाजीची साथ मिळाल्याने हा सोहळा अवर्णनीय असाच ठरला.
या सत्कार सोहळ्यावेळी बोलताना शरद पवार यांनी गोव्याबद्दलच्या आपल्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. तत्कालीन सरकारातील नेते शंकर लाड, दयानंद नार्वेकर व दिलखूष देसाई यांनी बंड करून ताईंना सत्तेपासून दूर केले व त्यावेळपासून गोव्याला खऱ्या अर्थाने राजकीय अस्थिरतेचा शाप लागला.आज प्रत्यक्षात या सत्कार सोहळ्याला संबोधित करतानाही राज्याची राजकीय स्थिती अस्थिर असावी,याला काय म्हणावे,असाही टोला त्यांनी यावेळी हाणला.ताईंनी आपल्या समर्थ नेतृत्वाखाली गोव्याच्या भवितव्याच्या दृष्टीने अनेक दूरदृष्टीच्या निर्णयांची मालिकाच लावली. गोवा हे पर्यटनस्थळ असल्याने इथे जगभरातील लोक प्रवेश करीत असतात पण इथे राजकारणाचेही पर्यटन करून एक पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याची सवयच नेत्यांना जडली आहे. शेकडोवर्षे पोर्तुगिजांची राजवट सहन करूनही इथे भारतीय संस्कृती टिकवण्याचे काम पूर्वीच्या पिढ्यांनी केले, त्यांना आपण नमन करतो,असेही ते म्हणाले. कला व संस्कृती क्षेत्रात पुढे येणाऱ्या स्त्रिया राजकीय व सामाजिक क्षेत्रांतही पुढे याव्यात,असे म्हणून त्यांनी ताईंच्या कर्तृत्वाचा वारसा येथील स्त्रियांनी खांद्यावर घ्यावा,असेही आवाहन केले.
यप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री दिगंबर कामत म्हणाले की ताईंनी सक्रिय राजकारणात नसतानाही समाजाशी आपले नाते कायम राखले. चांगल्या कामाची प्रशंसा करण्याचे मोठेपणही त्यांनी जपले,असेही ते म्हणाले. खासदार श्रीपाद नाईक यांनी ताईंनी आपल्या राजवटीत ठोस निर्णय घेण्याची क्षमता सिद्ध करून दाखवली.समाजाभिमुख व भ्रष्टाचारविरहित राजकारणाचा पाठही त्यांनी दाखवून दिला,असे ते म्हणाले.राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांनी स्व. भाऊसाहेब बांदोडकर व त्यानंतर शशिकलाताई काकोडकर यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती, असे विधान केले. त्यांनी खरोखरच कॉंग्रेस प्रवेश केला असता तर आज वेगळीच परिस्थिती असती,असेही ते म्हणाले. याप्रसंगी सुरुवातीला सुदिन ढवळीकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले व भाऊ तथा ताईंच्या संपूर्ण राजकीय इतिहासाचा आढावा घेतला.डॉ.अजय वैद्य यांनी मानपत्राचे वाचन केले. सुरुवातीस काही बाल कलाकारांनी सुंदर नृत्य सादर केले.आरती नायक यांनी दिवजाप्रज्वलनावेळी गणेशस्तवन सादर केले. शंभू भाऊ बांदेकर यांनी आभार प्रकट केले. या सोहळ्याला विद्यमान आमदार, आजी, माजी आमदार, मंत्री, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मंडळी व हजारोंच्या संख्येने ताईंचे चाहते,कार्यकर्ते व हितचिंतक हजर होते.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा