Monday, 25 January 2010

महागाईस पंतप्रधानही तितकेच जबाबदार

"ज्योतिष्चंद्र' पवार पुन्हा अडचणीत

पुणे, दि. २४ - महागाईविषयी निरनिराळी भाकितं करणारे केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आपल्या बेलगाम बोलण्यामुळे पुन्हा अडचणीत येण्याची चिन्हे दिसत असून, आता त्यांनी महागाईसाठी पंतप्रधानांनाच जबाबदार धरले आहे. महागाईचे बोल मला एकट्याला लावू नका, असे त्यांनी म्हटले आहे.
आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी महागाईसाठी पंतप्रधानही जबाबदार असल्याचे वक्तव्य केले. गेल्या काही दिवसांपासून धान्य, साखर, दूध, भाज्या यांचे भाव वाढण्याची भाकितं पवार करीत होते. असे बोलून ते अप्रत्यक्षपणे काळ्या बाजाराला प्रोत्साहनच देत असल्याची टीका होत होती. मागील आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाईबाबत आढावा घेतला. या बैठकीत खुद्द पंतप्रधानांनीही महागाईसंदर्भात भाकितं करणाऱ्या पवारांवर नाराजी व्यक्त केली होती. आता तर पवारांनी खुद्द पंतप्रधानांवर महागाईचे खापर फोडले आहे.
पवारांच्या बेलगाम बोलण्याने एकीकडे मायावती, नितीश कुमार हे मुख्यमंत्री नाराज असताना दुसरीकडे खुद्द कॉंग्रेसी नेतेही याविषयी जाहीर नाराजी व्यक्त करीत आहेत. अनेकांनी तर पवारांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी लावून धरली आहे.
यावर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर यानी कोल्हापूर येथे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की, पवार यांनी "शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला चांगला दर मिळाल्याने साखरेचे दर वाढत आहेत' अशी जी भूमिका घेतली आहे, ती पूर्णपणे फसवी आहे. कारण, साखर पंचवीस रुपये असताना जो दर शेतकऱ्यांना मिळत होता, त्यात कोठेही वाढ झालेली नाही.
पुण्यात त्यावर पवार यांना विचारले असता ते म्हणाले, जनतेने आम्हाला पूर्वीपेक्षा अधिक मते देऊन निवडून दिले आहे आणि शंका घेत बसणारांना पराभूत केले आहे.

1 comment:

  1. Anonymous05:52

    Yes you are right PAWAR, and now both of you resign then..

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा