पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी): 'नवीन वर्षांत सर्वांना सुख, समृद्धी, समाधान, ऐश्वर्य लाभो' अशा संदेशांनी मोबाईल, इंटरनेट आदी दळणवळणाची यंत्रणा या आठवड्यापर्यंत जॅम होईल. सर्वत्र एकमेकांना शुभेच्छांचा वर्षावही सुरू झाला आहे. सरत्या वर्षांतील कटू आठवणी विसरून नव्या आशा- आकांक्षांच्या दिशेने झेप घेण्याची व नव्या उत्साहाने पुढील काळाला सामोरे जाण्याची उमेद सगळे बाळगून आहेत. पण या मार्गात एक भला मोठा अडथळा सध्या निर्माण झाला आहे. जोपर्यंत हा अडथळा दूर होत नाही तोपर्यंत आपल्या शुभेच्छांना काहीही अर्थ राहणार नाही. जुन्या वर्षाचा उंबरठा ओलांडून नवीन वर्षांत पदार्पण करताना महागाईचा भस्मासुर दारातच उभा आहे व सर्वसामान्यांच्या मानगुटीवर बसून तो त्यांना गिळंकृत करू पाहत आहे. या महागाईच्या भस्मासुरापासून सुटका कशी करून घ्यायची याचे जबरदस्त आव्हान सर्वसामान्यांसमोर असेल. गेल्या एका वर्षांतील महागाईचा चढता आलेख पाहता सामान्य लोक कोणत्या परिस्थितीत जगत आहेत, याची जाणीव येईल. गोवा व मासे यांचे नाते अतूट पण या महागाईमुळे या नात्यालाही केव्हाच तडा गेलेला आहे. मासे सोडून शाकाहार जेवायचे ठरवले तर भाजी, डाळ इत्यादींचे भावही आटोक्याबाहेर पोहचले आहेत. सर्वसामान्य लोकांच्या जेवणाचा अविभाज्य घटक म्हणून पाहिले जात असलेली तूरडाळ गेल्या जानेवारी २००९ मध्ये ४२ ते ५० रुपये प्रतिकिलो होती ती आज ९२ रुपये प्रतिकिलोवर पोहचलेली आहे. नियमित वापरात येणारी साखर गेल्या जानेवारीत २१ रुपये प्रतिकिलो होती ती आता ३५ रुपयांवर पोहचलेली आहे. बटाटे - २१, कांदे - ३०, लसूण - ८२ आदींचे दरही कुठल्याकुठेच पोहचले आहेत. दूध, अंडी व पावांचेही तेच. या वस्तूंत दुप्पट दरवाढ झाल्याने गरिबांचे जीवन हलाखीचे बनले आहे. २००४ मध्ये सोळा ते सतरा रुपये प्रतिलीटर दराने मिळणारे दुधाचे दर पंच्याहत्तर टक्क्यांनी वाढले आहेत. सध्या दुधाचे दर प्रतिलीटर सव्वीस ते अठ्ठावीस रुपये एवढे झाले आहेत. गोंयचे "उंडे' (पाव) एक रुपयावरून अडीच रुपये झाला. चार वर्षांपूर्वी बाजारात साडेपाच ते सहा रुपयांना मिळणारा स्लाईस ब्रेड तब्बल चौदा रुपयांवर पोहचला. केवळ किराणा मालच नव्हे तर अन्नधान्य व डाळीच्या दरांतही बेसुमार वाढ झाली आहे. फळफळावळ, मांस व माशांबरोबरच वाहतूक व्यवस्था, पुस्तके व लेखनसाहित्य, स्वयंपाकाचा गॅस, केरोसीन आणि मनोरंजनाच्या साहित्य या दरवाढीपासून सुटलेले नाही. मध्यमवर्गीयांच्या तर तोंडचेच पाणीच या महागाईने पळवले. महिन्याचा पगार व नियमित खर्चाची सांगड घालताना त्यांची दमछाक होत असून त्यामुळे कौटुंबिक स्वास्थावरही विपरीत परिणाम होत असल्याची उदाहरणे समोर येत आहेत.
जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडलेले आहेत. तुटपुंज्या पगारावर, रोजंदारीवर, शेती व्यवसायावर तसेच पोटासाठी बारीकसारीक काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्यांवर महागाईमुळे जगणे कठीण बनत चालले आहे. ही समस्या एवढी उग्र रूप धारण करीत असतानाही केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला त्याचे काहीही सोयरसुतक नाही. आर्थिक मंदी, जागतिक तापमानवाढ आदींमुळे महागाई फोफावली आहे अशी मुक्ताफळे आघाडी सरकारचे नेते उधळीत आहेत. "आम आदमी' चा उद्धार करण्याची भाषा करणाऱ्या या सरकारच्या राजवटीत "डाळ- भात' जेवायचीही सोय राहिलेली नाही. महागाईच्याबाबतीत केंद्र सरकारने वेळीच हस्तक्षेप केला नाही तर त्याचे गंभीर परिणाम या देशालाच भोगावे लागतील.
"गोंयकार लोक तशे खावन जेवन सुशेगाद' अशी एक गोमंतकीयांची ओळख आहे. ही ओळखही आता नाहीशी होत चालली आहे. महागाईचे चटके आता गोमंतकीयांनाही टोचू लागले आहेत. दरडोई उत्पन्नाच्याबाबतीत आपला गोवा अग्रेसर आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत येथील जीवनमानही उंचावलेले त्यामुळे खऱ्या अर्थाने महागाईचा सर्वांत जास्त फटका "गोंयकारा' ना बसला आहे.
महागाई हा तसा आर्थिक विषय पण त्याचा थेट संबंध सामाजिक परिस्थितीशी आहे. महागाई वाढत असतानाच व्यसनाधीनतेसह इतरही अनेक प्रश्न गंभीर बनले आहेत. सर्वसामान्य माणूस परिस्थितीला शरण जात आहे व सामाजिक समस्या अधिकाधिक उग्र बनत चालल्या आहेत. विविध गुन्हेगारी प्रकारांत वाढ होऊन समाजात पसरलेली अस्वस्थता ही देखील याच महागाईचे अप्रत्यक्ष फलित आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोग मदतीला धावून आला. पण खाजगी क्षेत्रावर निर्भर असलेले लोक भरडले जात आहेत. एकीकडे कामगार कपातीचे प्रकार वाढत असताना दुसरीकडे महागाईचा उडालेला भडका भीषण परिस्थितीस कारणीभूत ठरणार की काय, अशीही शक्यता आहे. या एकूण परिस्थितीत सरकारचा "आम आदमी' मात्र पूर्णतः जाम झाला आहे.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा