भूमिपुत्रांचा ठाम निर्धार
कुंकळ्ळी, दि. १२ (प्रतिनिधी) - केपे तालुक्यातील बार्से, बाळ्ळी,बेतूल, खड्डे,मोरपिर्ल या पंचायत क्षेत्रांत होऊ घातलेल्या खाणींना प्राणपणाने विरोध करण्याचा निर्धार तेथील भूमिपुत्रांनी आज व्यक्त केला. या तालुक्यात होऊ घातलेल्या खाण प्रकल्पांना विरोध करण्यासाठी स्थानिक आमदार बाबू कवळेकर यांनी आपल्या निवासस्थानी विशेष बैठक बोलावली होती.
कोणत्याही पद्धतीत खाण प्रकल्पांचा शिरकाव केपे परिसरात होऊ देणार नाही, असे उपस्थितांनी या बैठकीत जोर देऊन सांगितले. जोपर्यंत राज्याचे खाण धोरण स्पष्ट होत नाही तोपर्यंत राज्यात एकाही खाण प्रकल्पाला परवानगी देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आपल्याला दिल्याचेआमदार कवळेकर यांनी सांगितले. खाणींबाबत कुणाच्याही आश्वासनांवर विसंबून राहणे कठीण आहे, त्यामुळे केपे तालुक्यातील जनतेने कुणाच्याही आमिषांना बळी न पडता आपली एकजूट कायम ठेवावी असे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्री कामत यांनी खाण धोरणाचे निमित्त सांगितले असले तरी हे धोरण जाहीर होऊनही याठिकाणी खाणींना प्रवेश देणार नाही, असेही यावेळी जाहीर करण्यात आले. याप्रसंगी माजी सरपंच खुशाली वेळीप यांनी सरकारने ग्रामस्थांना गृहीत धरू नये,असा इशारा दिला.वेळ पडल्यास येथील लोक आपली भूमी वाचवण्यासाठी प्राण पणाला लावतील, असेही ते म्हणाले. बेतूलच्या सरपंच विलोना डिसिल्वा यांनी याठिकाणी खाण नकोच, असे स्पष्ट करतानाच बेतूल पंचायत पूर्णतः जनतेबरोबर असणार, अशी ग्वाही दिली. ऍड. जॉन फर्नांडिस यांनी सुलकर्ण व कानरे येथे अलीकडेच सुमारे ११५० हेक्टर जागेत दोन खाण प्रकल्पांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यात आल्याची माहिती दिली. या बैठकीला सुमारे चारशे नागरिक हजर होते.
कवळेकर म्हणाले, मुख्यमंत्री कामत यांच्याशी आपण चर्चा केली व त्यांनी पाचही पंचायतीच्या प्रमुख ग्रामस्थांना चर्चेसाठी पाचारण केले आहे. तसेच खाणमालक या परिस्थितीत येथील जनतेला विविध आमिषे दाखवतील. मात्र एकदा एकजुटीत फूट पाडण्यात ते यशस्वी झाले तर भविष्यात याठिकाणी खाणींना कुणीही टाळू शकणार नाही. सरकार कुणाचे आहे याचा विचार न करता या आंदोलनात आपण पूर्णतः जनतेबरोबर असणार याची खात्री बाळगावी.
कवळेकर बुचकळ्यात!
बाबू कवळेकर यांनी यापूर्वी खाण विरोधी जाहीर सभा बाळ्ळी येथे बोलावण्याचे जाहीर केले होते.या बैठकीला मुख्यमंत्री दिगंबर कामत तसेच खाण खात्याच्या अधिकाऱ्यांनाही पाचारण करू,असेही सांगितले होते.बाबू कवळेकर यांनी केलेल्या या विधानामुळे ते मात्र बरेच अडचणीत सापडले. हे विधान केलेल्या दुसऱ्या दिवशीच बाबू कवळेकर यांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या आल्तिनो येथील सरकारी निवासस्थानी भेट घेतली व या विषयावर चर्चा केली.मुख्यमंत्र्यांना अशा जाहीर सभेत बोलावणे औचित्याला धरून नाही, असे यावेळी त्यांना सुनावण्यात आल्याचीही खबर आहे. या बैठकीबाबत त्यांच्यावर दबाव आल्यानेच अखेर त्यांनी या जाहीर सभेची जागा बदलून ती आपल्या निवासस्थानी बोलावण्याचा निर्णय घेतला. केपे तालुक्यात खाणींना विरोध करताना त्यांनी खाणमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांवर मात्र टीका करण्याचे टाळले.मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याचे सांगून फक्त कुणाच्या आश्वासनावर भरवसा ठेवून चालणार नाही,असे म्हणून त्यांनी सावध भूमिका घेतली.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा