पणजी, दि. २७ (प्रतिनिधी) - गेल्या विधानसभेत विरोधी पक्षनेत्यांनी उघडकीस आणलेल्या विद्यमान कॉंग्रेस सरकारच्या घोटाळ्यांबाबत पक्ष गंभीर असून त्याची सरकार आणि पक्षही चौकशी करणार असल्याचे आज प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी सांगितले. पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी वरील वक्तव्य केले. जे काही घडले आहे त्याची चौकशी होणे महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले.
विरोधी पक्षनेते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अबकारी खाते, खाण आणि माहिती व प्रसिद्धी खात्यातील घोटाळे उघडकीस आणले होते. अबकारी खात्यात ज्याप्रमाणे करोडो रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे, त्याचा "पर्दाफाश' करून विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्री कामत यांच्या सरकारची लक्तरेच वेशीवर टांगली होती. त्यानंतर आज प्रदेश कॉंग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष पहिल्यांदाच भेटल्याने पत्रकारांच्या विविध प्रश्नांना त्यांना सामोरे जावे लागले.
विद्यमान सरकारात असलेले शिक्षण मंत्री बाबूश मोन्सेरात आणि आरोग्य मंत्री विश्वजित राणे हे दोन्ही मंत्रीगण कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे अनेकवेळा जाहीर होऊन आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनीही घोषित करून अद्याप त्यांच्या प्रवेश का लांबणीवर पडला आहे, असे विचारले असता,"आमच्या बाजूने कोणताही अडचण नाही' असे श्री. शिरोडकर म्हणाले. आम्ही त्यांच्यासमोर कोणत्याही अटी ठेवलेल्या नाहीत. त्यांना यायचे असेल तरे त्यांनी बिनशर्त यावे. कॉंग्रेस पक्ष एवढा मोठा आहे की त्यात कोणालाही आणि कधीही प्रवेश देऊ शकतो.
महागाईविषयी छेडले असता श्री. शिरोडकर म्हणाले की, जिवनावश्यक वस्तूंवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी पक्षाने राज्यातील निवडक शंभर स्वस्त धान्य दुकानांवर सरकारने जिवनावश्यक वस्तू स्वस्त दरात द्यावेत, असा प्रस्ताव ठेवला असल्याची माहिती त्यांनी दिली. गोव्यात सुमारे चारशे स्वस्त धान्यांची दुकाने असून प्राथमिक स्तरावर ही सुविधा शंभर दुकानांवर उपलब्ध करण्याचा हा प्रस्ताव आहे, असे ते म्हणाले.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा