..हजारो लीटर तेल स्वाहा
..कोट्यवधींचे नुकसान
..उल्फाचा हात असल्याचा संशय
..राजधानीसह अनेक गाड्यांना विलंब
गुवाहाटी, दि. १७ : आसाममध्ये उल्फा बंडखोरांनी घडवून आणलेल्या स्फोटात तेलाचे टॅंकर घेऊन जाणाऱ्या मालगाडीचे १२ टॅंकर्स पेटले आणि ४ रूळावरून घसरल्याने प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. प्रत्येक टॅंकरमध्ये ७० हजार लीटर डिझेल होते. आगीत हे हजारो लीटर तेल स्वाहा झाले असून, त्यामुळे कोट्यवधींची हानी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे रेल्वे वाहतूकही मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाली आहे.
ही घटना आसामच्या जोरहाट जिल्ह्यात घडली. येथील मोेेरयानीनजीक उल्फाच्या बंडखोरांनी स्फोट घडवून आणला. या परिसरातून जात असलेल्या रेल्वेच्या तेल टॅंकरला लक्ष्य बनविण्यात आले होते. तेेलाचे टॅंकर घेऊन येत असलेली ही गाडी नुमालीगड रिफायनरीतून आली होती. ती उत्तरप्रदेशच्या दिशेने जात असताना मोरयानीनजीक हा प्रकार घडला. रेल्वेच्या चालकाने स्फोटाचा आवाज ऐकला. त्याने बाहेर डोकावून पाहताच मागील काही टॅंकसमधून धूर निघताना दिसला. काही टॅंकर्स जळत होते तर काही रूळावरून घसरले होते. त्याने प्रसंगावधान राखून गाडी थांबविली आणि लगेचच रेल्वे प्रशासनाच्या मदतीने इंजिनपासून टॅंकर्स वेगळे करण्यात आले. या स्फोटानंतर लागलेल्या आगीत सुमारे १२ टॅंकर्स जळाले. प्रत्येक टॅंकरमध्ये ७० हजार हजार लीटर तेल असल्याने ते बराच वेळपयर्र्त जळत होते. अन्य टॅंकर्सना लगेचच त्यापासून वेगळे करण्यात आले. चार टॅकर्स रूळावरून घसरले. एकूण ५१ टॅंकर्स असणाऱ्या या मालगाडीचा गार्ड आणि चालक सुरक्षित आहेत.
आगीचे उग्र स्वरूप लक्षात घेता लगेचच लष्कर, पोलिस, अग्निशमन दलासह आजूबाजूच्या परिसरातील बचाव दल तात्काळ कामाला लागले. जयपूरमध्ये ज्याप्रमाणे तेल टाक्यांना आग लागली होती आणि संपूर्ण इंधन जळून गेल्याशिवाय आग विझविणे शक्य नव्हते, त्याप्रमाणेच या गाडीच्या जळणाऱ्या टॅंकर्समधील इंधन संपण्याची वाट पाहण्याशिवाय पर्याय नाहीय.
रेल्वे वाहतूक विस्कळीत
या घटनेमुळे आसाममधील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून, राजधानीसह अनेक गाड्या विलंबाने धावत आहेत. रेल्वे मार्ग सुरळीत करण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर सुरू आहेत. पण, एकूण ३०० मीटरहून अधिक लांब रेल्वेमार्ग या घटनेमुळे उद्ध्वस्त झाला आहे. आगीमुळे परिसरात प्रचंड उष्णता पसरली आहे. त्यामुळे दुरुस्तीचे काम प्रभावित झाले आहे. ही आग विझण्यासाठी आणखी सात ते आठ तास लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दिल्ली-दिब्रुगड राजधानी एक्सप्रेसला सिमोेलूगुडी येथे थांबविण्यात आले असून त्यातील प्रवाशांना मोरयानीपर्यंत रस्ते मार्गाने आणण्याची व्यवस्था केली आहे. तेथून ते दुसऱ्या राजधानीने दिल्लीपर्यंत पोहोचू शकणार आहेत. काही गाड्यांचे मार्ग बदलविण्यात आले असून अमृतसरला जाणारी दिब्रुगड-अमृतसर एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. सर्व लोकलही रद्द करण्यात आल्याचे ईशान्य रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले आहे.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा