मुंबई, दि. ३ : राज्यातील हंगामी सरकारची मुदत संपायला दोन दिवस उरले असले तरीही कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील सरकार स्थापनेचा घोळ अजूनही मिटलेला नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री अशोक चव्हाण व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन आपापल्या पक्षाच्या भूमिका स्पष्ट केल्या. खातेवाटपाबाबत उभय पक्षांमध्ये एकमत होत नाही, तोपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारला बाहेरून पाठिंबा देईल, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणूक निकाल लागून १२ दिवस उलटले तरी अद्याप मंत्रिपदांचा वाद मिटलेला नाही. पूर्ण बहुमत मिळाल्यानंतरही कॉंग्रेस-राष्ट्रवादीने सरकार स्थापनेसाठीचा दावा न केल्याने राज्यात राजकीय संकट निर्माण झाले आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सरकार स्थापन करायचे नसेल तर राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी विरोधी शिवसेना-भाजप युतीच्या वतीने उद्या राज्यपालांकडे करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर काळजीवाहू मुख्यमंत्री अशोक चव्हाण दुपारी साडेअकराच्या सुमारास राजभवनात आले. त्यांनी राज्यपाल एस. सी. जमीर यांच्याशी सुमारे ३० मिनिटे चर्चा केली. चर्चा झाल्यानंतर मीडियाशी बोलणे टाळून मुख्यमंत्री लगेच निघून गेले. त्यानंतर राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे नेते छगन भुजबळ आणि प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील राजभवनावर दाखल झाले आणि त्यांनी राज्यपालांची भेट घेतली. राजभवनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यपाल जमीर यांनी सत्तास्थापनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पाचारण केले होते.
दरम्यान, खातेवाटपाबाबत एकमत होत नाही , तोपर्यंत सरकारला बाहेरून पाठिंबा द्यायला राष्ट्रवादी कॉंग्रेस तयार आहे, असे सांगत छगन भुजबळ यांनी सरकार स्थापनेला होत असलेल्या विलंबाची जबाबदारी कॉंग्रेसवर आणि मुख्यमंत्र्यांवर टाकली. राज्यपाल भेटीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा