वेधशाळेच्या अंदाजाची
मुख्यमंत्र्यांकडून खिल्ली
पणजी, दि. १९ (प्रतिनिधी): "वेधशाळेने कधी पाऊस आणि कधी ऊन पडणार, याचा अचूक अंदाज व्यक्त केला आहे का,' असा उलट सवाल करून "फयान' वादळात मृत्युमुखी पडलेल्या खलाशांचे आपल्याला कसलेही सोयरसुतक नसल्याचे आज सरकारने दाखवून दिले.
चक्रीवादळामुळे गोव्यातील मच्छीमार ट्रॉलरवरील ६८ खलाशी अजूनही बेपत्ता आहेत. त्यांची कोणतीच ठोस माहिती सरकारकडे उपलब्ध नाही. या चक्रीवादळाची कसलीही पूर्वकल्पना दिली नसल्याने पणजी वेधशाळा प्रमुखांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी नुकतीच केली होती. मात्र ही शक्यता मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त करून फेटाळून लावली.
"वेधशाळेने कधी अचूक अंदाज व्यक्त केल्याचे आमच्या माहितीत नाही. तसेच खोल समुद्रात जाणाऱ्या या मच्छिमारांकडे संपर्क साधण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. मच्छीमार जवळच होते, त्यांना ट्रॉलर मालकांनी मोबाईलवर संपर्क साधून माघारी फिरण्याचा संदेश दिला. मात्र काही खोल समुद्रात होते, त्यांना ही माहिती मिळाली नाही,' असे कामत म्हणाले. या ६८ खलाशांचा शोध घेण्याचे कामही थांबवण्यात आले असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. खोल समुद्रात बुडालेल्या या खलाशांचा शोध घेणे अत्यंत कठीण असल्याची माहिती त्यांनी दिली.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा