मडगाव, दि.११ (प्रतिनिधी): अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे आलेल्या सागरी उधाणामुळे कोलवा ते बेताळभाटी दरम्यानच्या समुद्र किनाऱ्याची महाभयानक झीज होऊन साधारण दोन मीटर ऊंचीने वाळू वाहून जाऊन भगदाड पडले आहे. तेथील नारळाची लागवड त्यामुळे संकटात येण्याची शक्यता निर्माण झाली असून किनारी रहिवाशांत घबराट माजली आहे. किनाऱ्यावरील जीवरक्षकांचे मनोरेही वाहून गेले आहेत.
वादळी हवामानामुळे पडलेला पाऊस व काल रात्रीपासून सुटलेले सोसाट्याचे वारे वगळता दक्षिणेत मोठी नुकसानी झाली नाही. पण आपत्कालीन व्यवस्थापन सज्ज होते. या वादळात अगोदरच वाळू वाहून गेल्यामुळे दोलायमान अवस्थेत असलेले बेताळभाटी किनाऱ्यावरील जीवरक्षकांसाठीचे मनोरेही वाहून गेले आहेत.
संपूर्ण सासष्टीची किनारपट्टी काल रात्रीपासून डोळ्यात तेल घालून सतर्क राहिली होती. हवामानखात्याच्या इशाऱ्यामुळे काल सायंकाळी एकही मच्छिमारी नैाका मोहीमेवर गेली नाही पण परवा गेलेले ट्रॉलर मात्र परतलेले नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
मडगाव परिसरात या वादळामुळे काही झाडे कोसळली व त्यामुळे मुख्य वीज वाहिनीत बिघाड झाला व सकाळच्या प्रहरात वीज पुरवठा खंडित राहिला.
नावेली बांध-असोेळणा येथे आंतोनियु सिकेरा यांच्या घरावर माड पडून सुमारे ५ हजारांचे नुकसान झाले तर नावेली सिकेटी येथे एक झाड तर कालात माजोर्डा येथे माड पडून वाहतूक खोळंबली . फातीमा कॉन्वेंटजवळ घरावर कलंडलेला माड अग्नीशामक दलाने धाव घेऊन कापून काढला.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा