चंडीगढ, दि. २४ - नव्वद सदस्यांच्या हरयाणा विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत चाळीस जागा मिळवत सर्वांत मोठा राजकीय पक्ष म्हणून समोर आलेल्या कॉंग्रेसने सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू केलेल्या असून दुसरीकडे ३१ जागा मिळवलेल्या हरयाणा लोकदलानेही ही संधी आपल्याही पक्षाला मिळावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे या दोन पक्षांत आता "कॉंटेकी टक्कर' सुरू झाली आहे.
कॉंग्रेसकडून निमंत्रण मिळाल्याने हरयाणा जनहित कॉंग्रेस आपल्या सहा आमदारांसह सरकारमध्ये सामील होणार आहे, असे त्या पक्षाचे नेते कुलदीप बिश्नोई यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर आपल्याला हरयाणा लोकदलाचेही निमंत्रण असल्याचा दावा त्यांनी केला. या राज्यात भाजपला चार तर बसपला एक आणि अपक्षांना सात जागा मिळाल्या आहेत. भाजपने मात्र अजून आपले पत्ते खोललेले नाहीत.
चौतालाही मैदानात...
कॉंग्रेसला जनतेने स्पष्ट बहुमत दिलेले नाही. त्यामुळे आपल्यालाही सत्ता स्थापनेची संधी द्यावी, असे हरयाणा लोकदलाचे अध्यक्ष ओमप्रकाश चौटाला यांनी राज्यपाल जगन्नाथ पहाडिया यांना पत्र लिहून कळवले आहे. चौताला यांनी सावध पण तेवढ्याच चाणाक्षपणे पावले टाकून कॉंग्रेसला खिंडीत गाठण्याचा डाव टाकला आहे. त्यात ते कितपत यशस्वी होतील, हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र एक खरे की, या राज्यात सत्ता स्थापन करताना कॉंग्रेसला अपक्षांच्या नाकदुऱ्या काढाव्या लागणार आहेत. कारण त्यांना भूपिंदर हुड्डा यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसला जनतेने स्पष्ट कौल दिलेला नाही.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा